कोलकाता – पश्चिम बंगाल मध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याची टीका त्या राज्याचे राज्यपाल जगदीप धनकर यांनी केली आहे. मानवाधिकार दिनानिमीत्त दिलेल्या एका व्हिडीओ संदेशात त्यांनी ही टीका केली आहे.
लोकशाहीचे रक्षण करायचे असेल तर लोकांच्या हक्कांची जपणूक होणे महत्वाचे आहे असे त्यांनी म्हटले आहे.तथापि अनेक ठिकाणी मानवाधिकारांचे उल्लंघन होत असून पश्चिम बंगाल हे त्याचे एक उदाहरण आहे अशा शब्दात त्यांनी राज्यातील तृणमुल कॉंग्रेसच्या सरकारवर टीका केली आहे.
या उल्लंघनाबद्दल लोक उघडपणे बोलूही शकत नाहीत असेही त्यांनी म्हटले आहे. लोकांना मुक्तपणे वावरता येणे आवश्यक आहे पण मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला ही संकल्पना मान्य नसावी. या राज्यातील गव्हर्नन्स घटनेतील कायद्याप्रमाणे नाही असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी घटनेतील तरतूदींनुसार आपले वर्तन ठेवावे असे आवाहनहीं त्यांनी केले. याचवेळी ममता बॅनर्जी यांनीही एक संदेश प्रसारीत केला असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, लोकांच्या मुलभूत हक्कंची पायमल्ली करणाऱ्यांना देशातील जनतेने एकत्र येऊन पराभूत केले पाहिजे. आपण एकत्र आलो तर अशा शक्तींचा आपण पराभव करू शकतो असे त्यांनी म्हटले आहे.