मुंबई – कॉंग्रेस पक्षाला नवचैतन्य आणण्यासाठी राहुल गांधींनी “भारत जोडो’ यात्रा काढली. दुसरीकडे महाराष्ट्रात कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याचे दिसत असून टोकाचे मतभेद वाढताना पाहायला मिळत आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हायकमांडला पत्र लिहिल्याचे समजते.
या वादाला विधानपरिषद निवडणुकांमध्ये सत्यजित तांबे प्रकरणावरून तोंड फुटले आहे. या निवडणुकीत नाना पटोले यांनी मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यासोबत कसं काम करायचं? असा प्रश्न थोरात यांनी पत्रात उपस्थित करत हायकमांडकडे तक्रार केली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.
नाना पटोले यांच्याविरोधात तक्रार फक्त बाळासाहेब थोरात यांनीच केली नाही. तर विदर्भातील काही कॉंग्रेसच्या नेत्यांनीही केलेली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेसला यश मिळाल्यानंतर नाना पटोले हे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. खरंतर त्यांची भूमिका ही वेगळ्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची होती. मात्र आमच्या आग्रहानंतर कॉंग्रेसचा उमेदवार दिला आणि तो निवडून आला. अशा प्रकारची तक्रार विदर्भातील काही नेत्यांनी हायकमांडकडे केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात कॉंग्रेसच्या नेत्यांचे गट-तट पाहायाला मिळतात. सध्या अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात या दोन दिग्गजांचे मोठे गट आहेत. नाना पटोलेही आपले अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळी नाना पटोले यांची मनमानी सुरू असल्याच्या तक्रारी होऊ लागल्या आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरुद्ध इतर कॉंग्रेसचे नेते असा अंतर्गत संघर्ष वाढताना पाहायला मिळत आहे.
यामुळे भाजपच्या आव्हानापेक्षा कॉंग्रेसमधील नेत्यांना आपल्याच पक्षातील नेत्यांचे एकमेकांना मोठे आव्हान वाटू लागले आहे. त्यामुळे पक्षाअंतर्गत असलेली ही मोठी गटबाजी कॉंग्रेससाठी घातक ठरु लागली आहे. या गटबाजीवर आणि तक्रारीवर कॉंग्रेसचे हायकमांड काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
प्रदेश कार्यकारिणीत तोडगा काढणार – पटोले
बाळासाहेब थोरात यांनी असे कोणते पत्र लिहिले असेल, असे मला वाटत नाही. याबाबत काही मजकूर उपलब्ध करून दिल्यास मी त्यावर बोलू शकेन, असा खुलासा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. तसेच कॉंग्रेस प्रदेश कार्यकारिणीची 13 फेब्रुवारी रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा करून तोडगा काढण्यात येणार आहे, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.