वडूज – करोनाच्या संक्रमणामुळे जगभरात छोटे-मोठे उद्योग, व्यवसाय बंद आहेत; परंतु मेंढपाळांना नेहमीच्या कामात सुट्टी मिळालेली नाही. आम्हाला कसला आलाय लॉकडाऊन, उन्हाळा, पावसाळा आमचे रहाटगाडगे असेच सुरू असते, असे मेंढपाळ म्हणत आहेत.
वाकेश्वर, ता. खटाव येथील माजी सरपंच कृष्णराव तुपे यांच्या शेतात सुखदेव गुजले, सुनील साठे, हरिबा मदने, सुरेश जाधव, दत्तू गलांडे या मेंढपाळांचा तळ बसला आहे. या पाच जणांच्या मिळून 600 शेळ्या-मेंढ्या आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सर्व जण एकत्र कळप करतात आणि पावसाळा आला की, आपापल्या घरी जातात. उन्हाळ्याच्या दिवसांत ज्या शेतकऱ्यांच्या शेतात तळ असतो, त्यांच्याकडून धान्य अथवा रोख रक्कम मिळते. तळापासून जवळ मेंढ्या दिवसभर चारायच्या, दुपारच्या वेळी नदी-ओढ्यावर नेऊन पाणी पाजायचे, असा मेंढपाळांचा दिनक्रम असतो.
वीस वर्षांत सुट्टी नाही
कोणताही ऋतू असो की सणवार, गेल्या 20 वर्षांत कधीच सुट्टी घेतली नाही. कधी तरी आजारी पडलो तर एखाद दुसरा दिवस सुट्टी घेऊन बायका पोरांना मेंढ्याकडे पाठवतो; पण काही झाले तरी या जित्राबाला उपाशीपोटी ठेवता येत नाही. लॉकडाऊन आमच्या विचारांच्या पल्याडचा असला तरी आम्ही सोशल डिस्टन्स ठेवण्याबरोबर मास्क म्हणून गमचाचा वापर करतो, असे या मेंढपाळांनी सांगितले.