नवी दिल्ली : देशभरात कोरोना बाधितांचा आकडा 56 हजारांच्या पुढे गेला असून आतापर्यंत 1886 लोकांचा यात बळी गेलाय. मागच्या 24 तासांमध्ये तब्बल 3390 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातच केंद्रीय सहसचिव लव अग्रवाल यांचे एक महत्वाचे वक्तव्य समोर आले आहे. आपण कोरोनासोबत जगायला शिकले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, मुंबईतील वाढती कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या पाहता केंद्राची टीम दर आठवड्याला मुंबईत येणार आहे. आज या टीमसोबत सहसचिव लव अग्रवाल आले होते.
संपूर्ण भारतात तिसऱ्या लॉक डाऊनच्या टप्प्यात लोकांचा जीव फारसा रमताना दिसत नाही. काही दिवसापूर्वी इन्फोसिसचे संस्थापक एन आर नारायण मूर्ती यांनी एक वेबीनारला संबोधित करताना सांगितले की, भारताला कोरोना विषाणूंसोबत जगायला शिकावे लागेल. कारण अनेक आरोग्य तज्ज्ञांच्या मते कोरोना हा काही दिवसात संपुष्टात येणार विषय नाही, हळूहळू याचे प्रमाण कमी होईल.
मूर्ती यांच्याप्रमाणेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे आणि दिल्लीचे मुखमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही आता कोरोनासोबत जगायला शिकले पाहिजे असे सूतोवाच काही दिवसांपूर्वीच केले आहे. त्यातच आता केंद्रीय मंत्रालयाकडूनही तसेच वक्तव्य आल्याने लॉकडाऊन लवकरचं उठवले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.