नवी दिल्ली -आंध्रप्रदेशातील वायूगळतीला कारणीभूत ठरलेल्या एलजी पॉलिमर्स इंडिया या कंपनीला शुक्रवारी 50 कोटी रूपयांचा तात्पुरता दंड ठोठावण्यात आला. ती कारवाई राष्ट्रीय हरित लवादाने केली.
संबंधित कंपनीच्या विशाखापट्टणममधील रसायन कारखान्यात गुरूवारी झालेल्या वायूगळतीने 11 जण मृत्युमुखी पडले. त्या दुर्घटनेची गंभीर दखल लवादाने घेतली. दुर्घटनेच्या चौकशीसाठी लवादाने पाच सदस्यीय समिती स्थापन केली. ती समिती दुर्घटनास्थळाला भेट देऊन 18 मेपर्यंत अहवाल सादर करेल. त्या अहवालाची छाननी होईपर्यंत कंपनीला तात्पुरता दंड भरण्यास सांगण्यात आले आहे.
नियमांचे आणि इतर वैधानिक तरतुदींचे पालन करण्यात कंपनीला अपयश आल्याचे प्रथमदर्शनी आढळत असल्याचे लवादाने नमूद केले आहे. जीवितहानी आणि पर्यावरणाचे नुकसान ध्यानात घेऊन कंपनीला विशाखापट्टणमच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे दंडाची रक्कम जमा करण्याचा आदेश देण्यात आला.
त्याशिवाय, लवादाने कंपनीबरोबरच केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आंध्र प्रदूषण नियंत्रण मंडळालाही नोटिसा बजावल्या. त्यांना दहा दिवसांत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर लवाद पुढील सुनावणी घेईल.