औरंगाबाद – राज्यापुढे असणारे महत्वाचे विषय बाजूला ठेवण्यासाठी आर्यन खान, सचिन वाझे, मुकेश अंबानींच्या घराखाली ठेवलेली बॉम्बची मोटार यासारखी प्रकरणे घडवली जातात. माध्यमांचा वापर करून घेत असल्याचे त्यांच्या लक्षात येत नाही, अशी खंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
त्याचवेळी देशातील पाच लाख व्यावसायिकांनी देश सोडून गेल्याची बातमी लोकसभेत दाखवण्यात आली, त्याचा उल्लेखही कोठे झाला नाही असे सांगत ओबीसी आरक्षणासाठी निवडणुका पुढे ढकलण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत आपली परखड मते मांडली. ते म्हणाले, आपण मूळ विषय बाजूला ठेवतो आणि नको त्या विषयात सगळे छापले जाते. तुम्हाला जीहिरात दिली जाते त्यानुसार तुम्ही छापता, परंतु शेवटी तुमचाही वापरच केला जातो.
उदाहरणार्थ आर्यन खान प्रकरण जवळपास 28 दिवस सुरू होतं. ज्या दिवशी बाहेर पडला त्यानंतर कोणी विचारलं देखील नाही, सध्या कसा आहे? तोपर्यंत जोरात सगळ्या गोष्टी सुरू होत्या. सुशांतसिंग प्रकरण त्यानंतर अंबानीच्या घराबाहेर बॉम्ब ठेवला त्याचे काय झाले पुढे माहीत नाही. शेवटी तुमचाही कुठतरी वापर केला जातोय आणि त्यामधून या सर्व गोष्टी घडत आहेत.
परवाची बातमी परंतु त्यामध्ये तुमच्या वरिष्ठांना किती रस होता मला माहिती नाही, परंतु लोकसभेत जी बातमी सांगितली गेली की पाच लाख व्यावसायिकांनी देश सोडला. पाच लाख व्यावासायिक ज्यावेळी देश सोडतात, त्यावेळी नोकऱ्यांवरती त्याचा काय परिणाम होतो? यावर आपल्याकडे चर्चा होत नाही. यावर आपल्याकडे बातम्या लावल्या जात नाही. हे पाच लाख जण गेले कुठे? याचा शोध घ्यावा असं कोणालाही वाटत नाही.
आज देशभरात असंख्य लोक अशी आहेत की ज्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, ज्यांच्याकडे मुलांचे शालेय शुल्क भरण्यासाठी पैसे नाहीत. अनेकांचे उद्योग बरबाद झालेले आहेत. संपलेले आहेत. काय होतंय काय माहिती नाही, इतकी अनिश्चतता सगळ्या गोष्टींची असताना, आम्ही काय फिरवतो आहोत तर आम्ही असले विषय फिरवतोय. या अनिश्चततेला जबाबदार सगळेचजण आहेत. जसे राजकारणी आहेत तसे तुम्हीपण आहात.
फेपर फोडणारे फुटले नाहीत..
राज ठाकरे म्हणाले, हे काय पहिल्यांदा होते असे नाही, पेपर काही पहिल्यांदा फुटला नाही. इतक्या वर्षे अनेकदा फुटला. पण ज्यांनी फोडला ते फुटले नाहीत अजून, म्हणून सारखे पेपर फुटतात. ज्याप्रकराचा शासन म्हणून एक वचक असायला पाहिजे, तो वचक राहत नाही मग.
औरंगाबादची निवडणूक वर्षभर पुढे गेलेली आहे. ज्यांच्या निवडणुका आहेत, त्याबद्दल खात्री नाही की त्या होतील की नाही होणार, की त्या आणखी सहा-आठ महिने पुढे जातील, की त्यासाठी म्हणून ओबीसीचं हे नवीन प्रकरण सुरू केलं आहे. केंद्राने मोजायचे का? राज्याने मोजायचे? या मोजामोजीत सगळ्या निवडणुका पुढे ढकलायच्या. कारण, ओबीसी समाजात आज अनेक गोष्टी सुरू झाल्या, पाट्या लावायला सुरूवात झाली आमच्याकडे मत मागायला येऊ नका म्हणून. त्यामुळे हा सगळा जो गोंधळ घातला गेला आहे.