मुंबई – सध्या महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. हे वातावरण महाराष्ट्राच्या विकासासाठी चांगलं नाही. आगामी काळात क्युबिक, एअर बस किमान हे प्रकल्प तरी महाराष्ट्रात यावेत, अशी आमची इच्छा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या वेळीही मुंबईतील अनेक उद्योग अहमदाबादला गेले. स्वत:साठी खोके आणि महाराष्ट्रासाठी धोके, असे हे सरकार असल्याची टीका शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
वेदांत कंपनीचा महाराष्ट्रात येणारा प्रकल्प गुजरातला गेल्याने ठाकरे यांनी शिंदे सरकारवर टीका केली. वेदांतचा हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार, हे जवळपास निश्चित झाले असताना हा प्रकल्प गुजरातला गेलाच कसा? असा सवाल करताना आदित्य ठाकरे म्हणाले, संबंधित कंपनीने पुण्याजवळील तळेगाव येथे प्रकल्प उभारण्यासाठी जागा निश्चित केली होती. सर्वकाही सकारात्मक घडत असताना, एवढा मोठा प्रकल्प गुजरातला कसा काय गेला? असा प्रश्न आम्हाला पडला आहे.
सुभाष देसाई आणि मी वेदांत कंपनीसोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पाडल्या. आमची वेदांत आणि फॉक्सकॉनच्या उद्योगाबाबत चर्चा झाली. त्यानंतर जागा निश्चितीसाठी मराठवाडा, विदर्भ आणि पुणे विभागात अनेक ठिकाणी पाहणी करण्यात आली. शेवटी पुण्याजवळील तळेगाव येथील जागा निश्चित केली. हा उद्योग गुजरातमध्ये जाण्याबाबत किंवा कुठेही इतरत्र जाण्याबाबत दु:ख नाही.
पण ही कंपनी महाराष्ट्रात येणार हे ठरलं असताना, शेवटच्या क्षणी ही गुंतवणूक दुसरीकडे का गेली? हा प्रश्न आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उद्योग पावणे दोन लाख कोटींचा आहे. या उद्योगासोबत इतर छोटे-मोठे उद्योग उभे राहणार होते. याच्या माध्यमातून रोजगार निर्माण होणार होते.