कोची – अदानी अत्यंत वेगाने श्रींमत कसे झाले, त्यांच्या या वेगवान प्रगतीत मोदी सरकारचा हात आहे की नाही याचे उत्तर लोकांना हवे आहे अशा शब्दात कॉंग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी सरकारवर हल्ला चढवला. ते म्हणाले की राहुल गांधी यांनी लोकसभेत अदानी विषय नेमकेपणाने उपस्थित केला. त्यावर उत्तर देण्याऐवजी मोदींनी कॉंग्रेसला शिव्या देण्यात धन्यता मानली.
मुख्य मुद्दा भलतीकडेच नेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण जगातल्या श्रीमंतांच्या यादीत अदानी इतक्या झटकन दुसऱ्या स्थानावर कसे पोहचले याचे उत्तर लोकांना हवे आहे. जो पर्यंत हे उत्तर मिळत नाहीं तो पर्यंत लोकांच्या डोक्यातून हा विषय जाणार नाही असेही त्यांनी नमूद केले.
ते म्हणाले की एलआयसी आणि स्टेट बॅंकेत सामान्य लोकांनी जो पैसा गुंतवला आहे, तो मोदींनी अदानींना दिला. त्यातून त्यांचे साम्राज्य वेगाने विकसीत कसे होईल याचीच काळजी त्यांनी घेतली. कॉंग्रेसने मोदी सरकारच्या गैरकारभाराच्या संबंधात लोकांची जनजागृती करण्यासाठी हाथसे हाथ जोडो ही मोहीम हाती घेतली आहे त्याच्या उद्घाटनासाठी वेणुगोपाल येथे आले होते.