मुंबई – बुधवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्य सरकारतर्फे साडेबारा हजार पोलिसांच्या भरतीला हिरवा कंदील दाखवण्यात आला. बऱ्याच दिवसांपासून पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी ही बातमी आनंदाची ठरली. मात्र सर्वोच्च न्यायालयातर्फे काही दिवसांपूर्वीच मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे भरती प्रक्रियेत राज्य सरकारने मराठा समाजाच्या उमेदवारांसाठी १३ टक्के जागा आरक्षित ठेवाव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे.
अशातच आज, शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मार्था समाजाच्या उमेदवारांसाठी पोलीस भरतीमध्ये १३ टक्के जागा राखीव ठेवण्याची मागणी केली. यानंतर आता गृहमंत्र्यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट करताना, पोलीस भरतीत १३ टक्के जागा मराठा समाजासाठी बाजूला काढता येतील का हे कायद्यानुसार तपासू असं म्हटलं आहे.
मेटे यांनी मार्था समाजासाठी १३ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात यावा अशी मागणी करणारा एक व्हिडीओ देखील ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये ते म्हणतात, “पोलीस भरतीत १३ टक्के जागा मराठा समाजासाठी रिक्त ठेवा. त्याच्यावर मंत्रिमंडळाचा निर्णय घ्या आणि सुप्रीम कोर्टाची परवानगी घेऊन नंतर भरुन टाका. मराठा समाजातील तरुण-तरुणींना भरतीत सामावून करुन घेतलं तरच हे सरकार आरक्षणासाठी सकारात्मक आहे असं म्हणता येईल. अन्यथा सगळी संतापाची प्रतिक्रिया रस्त्यावर पहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही.”
— Vinayak Tukaram Mete (@vinayakmete) September 17, 2020
यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील एक व्हिडीओ ट्विट केला असून या व्हिडिओद्वारे त्यांनी, “पोलीस भरतीत १३ टक्के जागा मराठा समाजासाठी बाजूला काढता येतील का हे कायद्यानुसार तपासू. राज्य सरकाराचा मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न राहणार आहे,” अशी भूमिका मांडली आहे.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) September 17, 2020