लोणी काळभोर – कारखाना चालवण्यासाठी अगर कारखान्याची कुठलीही मालमत्ता भाड्याने न देता तातडीने संचालक मंडळाची निवडणूक घेऊन इतर सर्व अडचणी सोडविण्याचा प्रयत्न लोकनियुक्त संचालक मंडळाने करावा, असा ठराव मंजूर करून थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची अधिमंडळ विशेष सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
गेली 12 वर्षे बंद असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची अधिमंडळ विशेष सर्वसाधारण सभा शनिवारी (दि. 11) सायंकाळी प्रशासकिय समिती अध्यक्ष तथा पुणे विभागाचे प्रादेशिक उपसंचालक (साखर) संजय गोंदे यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आली होती. चार वाजता कोरमअभावी सभा तहकूब करण्यात आली होती. त्यानंतर अर्ध्या तासाने सभा सुरू झालेली बरोबर एका तासात संपली.
या सर्वसाधारण सभेत 2011 पासून कारखाना बंद स्थितीत असल्याने तो चालू करण्याबाबत चर्चा करणे, कारखान्याची निवडणूक घेण्याबाबत चर्चा करून निर्णय घेणे, निवडणूक प्रक्रियेसाठी सभासद यादी अद्ययावत करणे, मयत वारस नोंदी, भाग हस्तांतरण आदीबाबत चर्चा करणे व निर्णय घेणे, कारखान्याचा आसवणी प्रकल्प, पेट्रोल पंप, शाळा आदींच्या कामकाजाबाबत चर्चा करणे, गोदाम व इतर अनुषंगिक मालमत्ता भाडेतत्वावर देण्याबाबत चर्चा करून निर्णय घेणे, कारखान्यावर सद्यस्थितीत सुरू असलेले बॅंक दावे तसेच अन्य न्यायालयीन प्रकरणांचा आढावा घेणे, संस्थेची एकूण मालमत्ता व अतिक्रमणे आदींबाबत माहिती घेऊन चर्चा करणे व निर्णय घेणे, तसेच अध्यक्षांच्या पूर्व परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांचा विचार विनिमय करणे आदी विषयांवर चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार होते.
यावेळी प्रशासकीय समितीचे अध्यक्ष संजय गोंदे, त्यांचे सहकारी डी. एन. पवार, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, जिल्हा बॅंकेचे माजी संचालक प्रकाश म्हस्के, संचालक प्रदीप कंद, कारखान्याचे माजी अध्यक्ष के. डी. कांचन, माजी उपाध्यक्ष माधव काळभोर, माजी संचालक सुरेश घुले, पांडुरंग काळे, प्रताप गायकवाड, सुभाष जगताप, रोहिदास उंद्रे, महादेव कांचन, राहुल काळभोर, माजी सभापती प्रकाश जगताप, राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे, भाजपचे राहुल शेवाळे, ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष प्रशांत काळभोर यांच्यासह साधारण पाचशे शेतकरी सभासद उपस्थित होते.
कोट :
कारखाना सुरू होण्याची ही शेवटची संधी असून सभासदांनी या संधीचे सोने कराव. 2018 नंतर कारखान्याचे लेखापरीक्षण करण्यात आले नसून वाळवीमुळे कारखान्याचे रेकॉर्डही खराब झाला आहे. विविध बॅंकांचे साधारण 116 कोटी, शासनाचे, शेतकऱ्यांचे, कामगारांचे व पुरवठादारांचे मिळून एकूण सव्वाशे ते दिडशे कोटी रुपये कारखान्यावर कर्ज आहे.
– संजय गोंदे, अध्यक्ष, प्रशासकीय समिती
आजच्या सभेच्या कार्यक्रम पत्रिकेत एकूण सात ठराव नमूद करण्यात आले होते. कारखाना सुरू करणे व निवडणूक घेण्याबाबत चर्चा हे दोनच विषय आज मंजूर करण्यात आले. उर्वरित इतर ठरावांवर निवडून आलेले संचालक मंडळ निर्णय घेईल, असे ठरवण्यात आले.
चौकट : 21409 पैकी 500 सभासद
कारखान्याचे एकूण 21409 सभासद आहेत. मात्र आजच्या बैठकीला अंदाजे 500 सभासद उपस्थित होते. सभासद उत्सुक व सक्रिय नसणे, नात्यागोत्याचे व पक्षीय राजकारण ही प्रमुख कारणे हा कारखाना बंद पडण्यामागे आहेत, अशी चर्चा उपस्थितांमध्ये यावेळी रंगली होती. आजच्या बैठकीतील ठरावा नंतरही कारखाना सुरू करण्यासंदर्भात नक्की काय होईल, याबद्दल ही सभासद यावेळी चर्चा करत होते.