कोरेगाव भीमा (शिरूर, पुणे)-येथे झालेल्या पावसाने मोठे नुकसान झले आहे. घरात पाणी शिरले, दुकानांमध्ये पाणी शिरून व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मुसळधार पाऊस पडल्याने सखल भागातील पावसाचे पाणी थेट पुणे-नगर महामार्गावर आल्याने वाहनचालकांची पाण्यातून वाहने काढतात दमछाक झाली. परिसरात हे पाणी व्यापाऱ्यांच्या दुकानात तसेच घरात घुसल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. सणासुदीचे दिवस असल्याने अनेक व्यापाऱ्यांनी दुकानात लाखो रुपयांच्या वस्तू आणल्या होत्या; परंतु पावसाच्या पाण्यामुळे त्या भिजून खराब झाल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर, अन्नधान्य व ओरिजनल कागदपत्रे यांचे नुकसान झाले. घरात पाणी शिरले व नागरिकांना मुलाबळांसह रात्र पाण्यात काढावी लागली.
याबाबत बोलताना गणेश जाधव यांनी सांगितले की, नैसर्गिक रित्या पावसाचे पाणी वाहून जाणारे स्रोत बुजवले गेल्याने व नागरी वस्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्याने पावसाचे पाणी अडले जाते, आमचे खूप आर्थिक नुकसान झाले आहे. कोरेगाव भीमा येथील प्रसिद्ध कापड दुकानदार सत्यनारायण क्लॉथ सेंटरचे मालक निलेश अग्रवाल यांनी सांगितले की, कालच्या पावसाने आमचे अंदाज न लावता येण्यासारखे नुकसान झाले आहे. सणसुदीच्या तोंडावर आम्ही कालच नवीन माल भरला होता. दुकानांच्या चारी बाजूंनी पाण्याचे तळे साचले आहे.
कोरेगाव भीमा परिसरात मोठ्या प्रमाणावर प्लॉटिंग झाली आहे. यात नैसर्गिक ओढे, नाले, पाणी जाण्यासाठी असलेले छोटे छोटे प्रवाह अडवल्याने पाणी जाणार तरी कसे? याबाबत आता तरी योग्य ती कार्यवाही होऊन नागरिकांच्या जीविताशी खेळ थांबवावा अशी मागणी होत आहे.
काही दिवसांपूर्वी वढू रोड ते कोरेगाव भिमा चौक येथे 24 लाख रुपये खर्च करून सांडपाणी लाइन बनवली त्याचा काही उपयोग होत नसल्याचे दिसत आहे. पुणे नगर मार्गावर पाणी मोठ्या प्रमाणावर साचत आहे. तसेच गणेश भुवन ते नदीपर्यंत गटारलाइन बनवली पण तिला एकही चेंबर बनवला नाही त्यामुळे ती असून नसल्यासारखी आहे.
रात्रीच्या वेळी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी शिक्रापूर पोलिसांचे बरोबर स्थानिक युवक मोठ्या संख्येने वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करत होते. शिक्रापूर पोलिसांच्या वतीने पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सहायक निरीक्षक मयूर वैरागकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, योगेश पाटील, राजेंद्र मदने, होमगार्ड स्वप्नील खैरे, प्रसाद ठोंबरे, अशोक मिडगुले, अमोल पवार, प्रदीप नाणेकर, अनिकेत क्षीरसागर, नामदेव भोसले आदींनी वाहतूक कोंडी सुरळीत होण्यासाठी प्रयत्न केले.