- पावसाने केला कहर
- जनजीवन झाले विस्कळीत
चऱ्होली –
पिंपरी-चिंचवड शहरात व उपनगरांमध्ये बुधवारी दिवसभर हालक्या सरी कोसळत होत्या. परंतु रात्री नऊनंतर अचानक पावसाने रौद्ररूप धारण करत शहर परिसरातील रस्ते जलमय करून टाकले. एवढेच नव्हे तर मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे परिसरातील पाण्याचा निचरा न झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तर काही ठिकाणी सोसायटी, चाळी तसेच बैठ्या घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
परतीच्या पावसाबरोबरच सोसाट्याचा वारा यामुळे दोन ते तीन तासांत परिसराचे रूपडेच पालटून गेले. संपूर्ण रस्ते, परिसर जलमय झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. पावसाचा जोर एवढा होता की दिघीतील सर्व परिसरात पाणी तुंबले होते. त्यामुळे सर्व रस्त्यांना तळ्याचे, नदीचे स्वरूप आले होते. पावसाच्या तडाख्याने दिघी, चऱ्होली, वडमुखवाडी येथील बहुतेक घरांमध्ये, सोसायटीच्या आवारात, मोकळ्या मैदानात व आळंदी पालखी मार्गावरसुद्धा पाण्याचे तलाव तयार झाल्याने संपूर्ण परिसर पाण्याखाली गेल्याची विदारक दृश्य पाहण्यास मिळाले.
दिघी परिसरातील विनायक पार्क, चौधरी पार्क, रुणवाल पार्क, गजानन महाराजनगर, ज्ञानेश्वर पार्क, आदर्शनगर, बीयू भंडारी, दिघी गावठाण परिसर, परांडेनगर, साई पार्क, जुना जकात नाका, दत्तनगर, कृष्णानगर, भारतमातानगर, आळंदी रस्त्यावरील वाळके मळा, मॅगझीन चौक, साई मंदिर, चऱ्होली फाटा, चऱ्होलीतील वेताळ बुवा चौक, मंडई परिसर, गावठाण या भागांमध्ये पावसाने कहर केला होता. रस्त्यावरील बरेच चेंबर तुंबल्याने पाणी बाहेर ओसंडून वाहत होते. सकाळपर्यंत ही परिस्थिती तशीच होती.
घरात पाणी शिरल्यामुळे घरातील धान्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू, व इतर सामानाचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. तर काही घरात पाच सहा फूट पाणी शिरल्याने मध्यरात्री कुटुंबाला सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. विनायक पार्कमधील स्नेहछाया प्रकल्पात पाणी शिरल्याने येथील लहान मुलांना तात्काळ व्यवस्था करून सुखरूप बाहेर काढले. पावसाचा वाढलेला जोर, खंडित झालेला वीजपुरवठा, व रात्रीच्या वेळी मदतीसाठी कुणी नाही अशा बिकट संकटात सापडलेली ही रात्र नागरिकांसाठी काळरात्र ठरली.
वारंवार वीजपुरवठा खंडित
पावसाने रौद्ररूप धारण केले होते. बाहेर पावसाच्या सरी आणि सोसायट्याचा वारा सुरू होता. घरात पाणी, बाहेर पाणी नागरिकांना काय करावे काही सुचत नव्हते. अशा परिस्थितीतही वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने अडचणीत आणखी भर पडली. काही ठिकाणी वायरीचे जाळे लोंबकळत खाली आले होते. आळंदी-दिघी रस्त्यावरील खांबांवर लावलेली फ्लेक्स हवेने उडत रस्त्यावर आली. सुदैवाने कुणालाही इजा पोहचली नाही.