मुंबई – काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यात काही ठिकाणी निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे आज राज्यभरात व्होडाफोन आयडिया कंपनीच्या ग्राहकांना कनेक्टिव्हिटीच्या समस्येला सामोरे जावे लागले.
दिवसभर व्होडाफोन आयडिया कंपनीच्या मोबाइलधारकांना कनेक्टिव्हिटी मिळत नव्हती. त्यामुळे या ग्राहकांना कोणाशीही मोबाइलवरून संपर्क साधता येऊ शकत नव्हता किंवा या ग्राहकांशीही संपर्क साधला जाऊ शकत नव्हता. ज्या ग्राहकांच्या मोबाइलला कनेक्टिव्हिटी मिळत होती, त्यांना संपर्कात वारंवार अडथळे येत होते.
नेहमी टॉवरच्या समस्येमुळे एखाद्या भागापुरती कनेक्टिव्हिटी मिळत नसते. मात्र, गुरुवारी संपूर्ण राज्यभरातील ग्राहकांनाच या समस्येचा सामना करावा लागला. तांत्रिक समस्या सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न कंपन्यांच्या तंत्रज्ञांकडून केला जात असल्याचे कंपनीने सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
कनेक्टिव्हिटी मिळत नसल्याबद्दल व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेकडो ग्राहकांनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला.
पश्चिम महाराष्ट्रात आणि गोवा, कर्नाटक, आंध्र आदी राज्यांमध्ये बुध्वारी संध्याकाळपासून दररोज मुसळधार पाऊस पडतो आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचून राहिले आहे.