पुणे: येत्या चार दिवसात महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये उष्णतेची लाट पसरण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिला आहे. संपूर्ण एप्रिल महिना उष्णतेची तीव्रता राज्यभर विशेष जाणवलेली नव्हती. दिवसाचे तापमान सर्वसाधारणपणे सरासरी इतकेच राहिले होते. मात्र आता उष्णतेची तीव्रता अधिक जाणवण्याची शक्यता आहे.
शुक्रवारपासून उष्णतेची ही तीव्रता जाणवण्यास सुरुवात झाली आहे. विशेषतः विदर्भामध्ये ही उष्णतेची लाट जाणवण्यास सुरुवात झाली. राज्यात शुक्रवारी सर्वाधिक 45 अंश इतके तापमान यवतमाळ इथे नोंदवले गेले आहे. तर त्या खालोखाल अकोला इथे 44.8 इतके तापमान नोंदवले गेले. हवामान खात्याने दिलेल्या मे महिन्याच्या अंदाजानुसार मध्य, उत्तर आणि पश्चिम भारतापेक्षा महाराष्ट्रातील तापमान अधिक राहण्याची शक्यता आहे. मे आणि जून महिन्यात विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णता अधिक तीव्रतेने जाणवण्याची शक्यता आहे. नागपूर, अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्याला नागपूर येथील हवामान केंद्राने “रेड अलर्ट’ दिला आहे.
शनिवारपर्यंत परभणी शहर राज्यातील सर्वात उष्ण शहर राहिले होते. तिथे 44.2 अंश तापमान नोंदवले गेले होते. महाराष्ट्राबरोबरच शेजारील मध्यप्रदेशातही 4 आणि 5 मे रोजी उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता आहे.