परिसरात झुडपांचा विळखा, दुर्गंधी : वेळेवर लसी उपलब्धच नाहीत
निमसाखर – येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राभोवतीचा परिसर दुर्गंधी आणि व काटेरी झुडपांच्या विळख्यात अडकला आहे. ग्रामपंचायतीने बाहेरील स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. उपकेंद्रातील कर्मचारी वेळेवर हजर नसतात. या ठिकाणी रुग्ण तपासणीसाठी असणारे डॉक्टरच भेटत नाहीत. वेळेवर लसीही उपलब्ध होत नसल्याच्या ग्रामस्थांमधून तक्रारी आहेत. आत्ता खऱ्या अर्थाने निमसाखर उपकेंद्राचीच उपचाराचीच वेळ आली असल्याचे ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
निमसाखर व वाड्या- वस्त्यांवरील साडेपाच हजार लोकसंख्येचे हे गाव आहे. त्यामुळे वाड्या-वस्त्यांवरील शेतकरी, गरीब कुटुंबातील ग्रामस्थांबरोबर सर्वसामान्य नागरिक सुद्धा प्राथमिक उपकेंद्र, निमसाखर येथील दवाखान्यात उपचारासाठी येतात. गर्भवती महिला, लहान मुलांना लसीकरण, औषधांसह अन्य बाबींचा लाभ यापूर्वी
झाला आहे.
मात्र, सध्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राकडे संबंधीत खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. या दवाखान्याकडे संबंधीत काही कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केल्यानंतर संबंधीत अधिकारी निमसाखर आरोग्य उपकेंद्राची पाहणी केली. याठिकाणी सकाळी 11 वाजून गेले तरी हे उपकेंद्र बंदच असल्याचे दिसले. वास्तविक उपकेंद्रास एक आरोग्य सेवक, एक कंत्राटी आरोग्य सेविका, एक अर्धवेळ स्री परिचारिका, आरोग्य वर्धिनी योजनेअंतर्गत एक डॉक्टर अशी टीम आहे.
निमसाखर गावची लोकसंख्या सुमारे साडेपाच हजारांच्या आसपास आहे. एक हजार लोकसंख्येसाठी एक याप्रकारे अशा वर्कर कार्यरत आहेत. तरी देखील अकरा वाजले तरी उपकेंद्राला कुलुपच असल्याचे निर्देशनाला आले. या ठिकाणी या परिसरातील रुग्ण येतात. कुलूप पाहून माघारी जात आहेत.
काही लसी महागड्या असतात. त्या लसी फोडल्यानंतर काही वेळच वापरता येतात. रुग्णांचे नियोजन करूनच या लसी उपलब्ध केल्या जात आहेत.
– डॉ प्रशांत महाजन, वैद्यकीय अधिकारी. निमसाखर.
दारूच्या बाटल्यांचा खच –
निमसाखरमधील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या चारीबाजूंनी घाणीमुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. काटेरी झुडपांचा विळखा आहे. उपकेंद्राच्या भागात काटेरी झुडपे व इमारतीचा आडोशामुळे शौचालयाप्रमाणे काही मंडळी वापर करीत आहेत. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. सध्या गुटखाबंदी असून देखील याठिकाणी गुटख्याच्या मोकळ्या पुड्या तसेच गुटखा खाऊन पिचकारी मारली जात आहे.
दारूच्या मोकळ्या बाटल्याही फेकले जात असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करीत आहेत. उपकेंद्रापासून अगदी हाकेच्या अंतरावरच जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. त्याचा त्रास मुलांना देखील सहन करावा लागत आहे. उपकेंद्रात काही लसी भेटत नसल्याच्या तक्रारी नागरिकांमधून होत आहेत.