चिंबळी – खेड तालुक्याच्या दक्षिण भागातील शेतकऱ्यांनी तीन आठवड्यांपूर्वी टोकण पद्धतीने लागवड करण्यात आलेल्या गहूू पिक लहरी वातावरणामुळे पिवळे पडू लागले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. पहिल्यांदा अवकाळीने झोडपले आहे. त्यात वातावरणातील बदलाचा फटका बसला आहे.
कुरूळी, चिंबळी, मोई, निघोजे, केळगाव, सोळू, धानोरे, मरकळ परिसरात शेतकऱ्यांनी गेल्या महिन्यात खरीप हंगामातील सोयाबीन, वाल, मूग आदी पिकांची काढणी करून शेतीची मशागत केली होती; परंतु त्याचवेळी परतीच्या पावसाने अनेक दिवस धुमाकुळ घातल्याने रब्बी हंगामातील पिकांची पेरणी रखडली होती; त्यानतंर पावसाने विश्रांती घेतली असल्याने शेतीची पुन्हा मशागत करून कमी खर्चात जादा उत्पादन देणारे गहू पिकाची टोकण पद्धतीने लागवड केली होती.
मात्र, सकाळी थंडी, दुपारी उष्णता तर मध्यचेच ढगाळ वातावरण या लहरी वातावरणामुळे गव्हाचे पीक पिवळे पडू लागले आहे, त्यामुळे किमान हे पीक पूर्णपणे हातात यावे, यासाठी शेतकरी पदरमोड करून पिकाखवर औषध फवारणी करीत आहेत.