राहाता, (प्रतिनिधी)- शहरातील संत सावतामाळी मंदिरात अखिल भारतीय समता परिषद व समस्त माळी पंच कमिटी तसेच ऋणानुबंध युवा मंच यांच्यावतीने महिलांची आरोग्य तपासणी व आरोग्य विषयक मार्गदर्शन करून महिला दिन साजरा करण्यात आला.
नॅचरोपॅथी तज्ज्ञ डॉ. पूनम मोढे यांनी सांगितले की, महिला आपल्या कुटुंबाकडे लक्ष देते पण ती स्वतःच्या आरोग्याकडं लक्ष देत नाही. प्रत्येक स्त्री हा कुटुंबाचा कणा आहे. स्त्री जर निरोगी असेल तर ते कुटुंब ठणठणीत राहते.याकरिता स्त्रियांनी आपल्या जीवनशैलीत बदल केला पाहिजे.
भारत देश कॅन्सर व मधुमेह आजाराबाबत बाबतीत जगाची राजधानी बनला आहे. प्रत्येक पाच व्यक्तीमागे एका व्यक्तीस मधुमेह आहे आणि प्रत्येक पाच कुटुंबातील व्यक्तिमागे एका व्यक्तीस कॅन्सर आजाराने त्रस्त आहे. हे सर्व टाळण्याकरिता रोज एक तास व्यायाम केला पाहिजे. अॅलोपॅथी औषधांऐवजी आयुर्वेदिक ,नॅचरोपॅथीचा आपल्या जीवनशैलीत समावेश केला तर निश्चितच निरोगी निरामय आणि आनंदी जीवन प्रत्येक महिलेस मिळू शकते.
यावेळी २०० पेक्षा जास्त महिलांची आरोग्य तपासणी केली. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. सावित्रीची लेक ग्रुप अध्यक्षा शालिनीताई जेजुरकर, अनिता आनप, मीना माळवदे ,चंद्रकला गायकवाड, माधुरी माळवे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.