बरोबर दोन वर्षांपूर्वी म्हणजे 23 मार्च 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार भारतातील तमाम नागरिकांनी एक दिवसाचा लॉकडाऊन पाळला होता. त्या दिवशी घराच्या गॅलरीमध्ये येऊन नागरिकांनी थाळी बडवून आणि टाळ्या वाजवत करोनाबाबत सुरक्षिततेसाठी जागृती निर्माण केली होती. या सर्व प्रक्रियेवर तेव्हा टीका झाली होती. आज बरोबर दोन वर्षांनंतर परिस्थिती सुधारली असली तरी करोनाचे भय अद्यापही कायम आहे. या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये सर्वच समाजघटकांनी करोनाची विविध रूपे आणि त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती याचा अनुभव घेतला आहे. आज भारतातील परिस्थिती जरी आटोक्यात असली तरी चीन, तैवान आणि इतर काही देशांमध्ये करोनाचा एक नवीन व्हेरियंट मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर भारतामध्येसुद्धा सावधगिरी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुळात कोविड 19 या नावाने ओळखला जाणारा हा विषाणू 2019 मध्ये चीनमध्ये तयार झाला होता आणि नंतर जगाच्या कानाकोपऱ्यात पसरला. भारतामध्ये 2020 मध्ये या विषाणूचा शिरकाव झाला आणि मार्च 2020 नंतर भारतातील परिस्थिती अतिशय बिकट झाली होती.
पहिले सहा महिने कधी लॉकडाऊन तर कधी व्यवहार सुरू अशी परिस्थिती होती. त्याकाळात सर्वत्र गोंधळाची परिस्थिती होती. कोणाला काय करावे काही समजत नव्हते; पण जेव्हा करोनावर मात करण्यासाठी लसीकरणाचा पर्याय उपलब्ध झाला त्यानंतर परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणाखाली आली. अर्थात, लसीकरणाचे सर्व डोस घेतल्यानंतरही करोनाची तिसरी लाट भारतात येऊन गेली. 2019 मध्ये सापडलेला कोविड असो, 2020 मध्ये डेल्टा असो किंवा 2021 मध्ये ओमायक्रॉन असो अशा लाटा येत गेल्या. आता याच पार्श्वभूमीवर 2022 मध्ये डेल्टा आणि ओमायक्रॉन यांचा संकर असलेला डेल्टाक्रॉन नावाचा नवीन विषाणू लाट निर्माण करण्याच्या परिस्थितीत आहे. गेल्या काही महिन्यांच्या कालावधीमध्ये भारतातील परिस्थिती चांगली नियंत्रणाखाली असली तरी ताज्या आकडेवारीप्रमाणे कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये या नवीन विषाणूचे काही रुग्ण सापडल्याच्या बातम्याही येत आहेत. काही लोकांची तपासणी करण्यात आली असून त्यांचे निष्कर्ष समोर आले की या नवीन विषाणूची लाट येणार आहे की नाही, हे समजू शकेल. अर्थात, दोन वर्षांतील परिस्थितीचा भीषण अनुभव गाठीशी असल्याने पुन्हा एकदा लोकांच्या मनात भीती निर्माण झाली असल्यास त्यात नवल नाही. अर्थात पहिली लाट प्रभावी करण्यामध्ये सामान्य नागरिकांचा हातभार जास्त होता. जर ही चौथी लाट निर्माण व्हायची नसेल तर त्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखण्याची जास्त गरज आहे.
गेल्या दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये भारतातील आणि महाराष्ट्रातील सर्व व्यवहार सुरू झाल्यानंतर अतिशय अनिर्बंधपणे आणि बेशिस्तपणे गर्दी केली जात आहे. या गर्दीच्या चेहऱ्यावर कोठेही शंभर टक्के प्रमाणात मास्क दिसत नाही, कोठेही योग्य सामाजिक अंतर पाळले जात नाही किंवा सार्वजनिक व्यवहाराच्या ठिकाणी सॅनिटायझरचा वापर करण्याचे प्रमाणही जवळजवळ थंडावले आहे. अशी जर परिस्थिती असेल तर आपणच या नवीन लाटेला आमंत्रण देत आहोत, असेच म्हणावे लागेल. भारतीय नागरिकांचा लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला. मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर आणि योग्य अंतर ठेवण्याचा निर्णय या त्रिसूत्रीचा मनापासून अवलंब केल्याने करोनावर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळाले होते. मात्र आज देशातील किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही शहरात किंवा खेड्यात वावरणाऱ्या गर्दीवर नजर टाकली तर अनेक चेहरे मास्क न घातलेले दिसत आहेत. विषाणू नामशेष झाला अशा अविर्भावात सर्व जण वावरत आहेत आणि हा अविर्भाव निश्चितच त्रासदायक आणि नुकसानकारक ठरणार आहे. समाजातील सर्व व्यवहार सुरळीत होत असताना आणि अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर येत असताना पुन्हा एकदा लॉकडाऊनची प्रक्रिया आणि सर्व निर्बंध जर लागू झाले तर ते कोणालाच परवडणार नाही, हे लक्षात घ्यावे.
अनेक प्रमुख आरोग्य तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे करोना विषाणू सोबत जगण्याची सवय आता आपल्याला करावी लागणार आहे. याचाच अर्थ करोना विषाणूचे नवीन प्रकार यापुढेही येत राहणार आहेत. पण दरवेळी असा एखादा नवीन प्रकार समोर आला की पुन्हा एकदा लॉकडाऊनची प्रक्रिया आणि सर्व निर्बंध लागू करणे असे झाले तर सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था ठप्प होऊन जाईल. साहजिकच ज्याप्रमाणे गेल्या अनेक वर्षांमध्ये सर्वसामान्य नागरिकांनी टायफाइड किंवा मलेरिया यासारख्या आजारांबरोबर जगणे शिकून घेतले आहे त्याचप्रमाणे आता करोनासोबतही जगणे शिकून घ्यावे लागणार आहे. पण ज्याप्रमाणे टायफाइड किंवा मलेरिया हे आजार होऊ नयेत म्हणून आपण काळजी घेतो त्याच प्रकारची काळजी करोना या विषाणूची बाधा होऊ नये म्हणून घ्यावी लागणार आहे. त्यासाठी मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर आणि योग्य अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा वापर करण्याशिवाय पर्याय नाही. त्याशिवाय ज्या लोकांनी अजूनही केवळ गैरसमजातून लसीकरणाचे कवच घेतलेले नाही त्यांनी लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण करणे केवळ त्यांच्यासाठीच नाही,
तर समाजातील इतर लोकांसाठीसुद्धा फायदेशीर आहे. कारण ज्यांनी लस घेतलेली नाही त्यांना विषाणूची बाधा होण्याचा धोका जास्त आहे. त्यांना बाधा झाल्यानंतर ती पसरण्याचा धोकाही तेवढाच जास्त आहे. विषाणूच्या नवीन प्रकाराचे भय जर कमी करायचे असेल तर सरकारने आगामी कालावधीमध्ये लसीकरणाची मोहीम पूर्णत्वास नेण्यास प्राधान्य देण्याची गरज आहे. केवळ तिसरा डोस देण्याबाबत नियोजन करण्याबरोबरच 18 वर्षांखालील लहान मुलांच्या लसीकरणाच्या मोहिमेमध्ये शंभर टक्के लसीकरण पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण या वयोगटातील मुले आता शाळा आणि महाविद्यालयात जाऊ लागली आहेत आणि त्यांना जर लसीकरणाचे कवच उपलब्ध झाले नसेल तर त्यांना धोका जास्त आहे. ज्याप्रमाणे आपण तिसऱ्या लाटेवर मात केली होती तशीच करोनाची भविष्यातील चौथी लाटही दूर ठेवू शकतो.