- नागरिक हवालदिल
- पाणीगळतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
चिखली – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत नोव्हेंबर 2019 पासून एक दिवस आड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. अतिरिक्त 50 एमएलडी पाणी उपलब्ध झाल्यानंतरच सदरचा पाणीपुरवठा नियमित होईल. त्यासाठी आणखी एक वर्ष कालावधी लागू शकतो. त्यामुळे शहरात एक दिवस पाणीपुरवठाच केला जाईल, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काही दिवसांपूर्वींच स्पष्ट केल्याने समाविष्ट गावांतील नागरिक हवालदिल झालेले आहेत. महापालिका आयुक्तांच्या या धोरणामुळे शहरातील टॅंकर लॉबीला सुगीचे दिवस आले असून नागरिकांना आर्थिंक बुर्दंड सहन करावा लागत आहे.
यावर्षी पिंपरी-चिंचवड व मावळ परिसरात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करण्यात येत असलेले पवना धरण 100 टक्के भरलेले आहे. तरी देखील महापालिका प्रशासन शहराला सुरळीत व पुरेसा पाणीपुरवठा करत नसल्याने नागरिकांत संताप आहे. सध्या शहरात मोठ्या प्रमाणावर पाणीगळती होत आहे. परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असून नागरिकांना होणार पाणीपुरवठा यात कपात करत आहे.
साधारण शहरात दररोज 35 टक्क्यांहून जास्त पाणीगळती होत आहे. तसेच वितरण व्यवस्थेत सावळा गोंधळ आहे. त्यामुळे महापालिकेत समाविष्ट झालेल्या चिखली, जाधववाडी, चऱ्होली, दिघी, बोपखेल भागात अजूनही पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांमध्ये तसेच विशेषतः महिलांवर्गामध्ये मोठी नाराजी आहे. समाविष्ट गावांचा मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे. रहिवासी पट्टा वाढला आहे. मोठ मोठ्या गगनचुंबी इमारती उभा राहत आहेत. परंतु पाण्यासाठी नागरिकांना वणवण फिरण्याची वेळ येत आहे. पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने सोसायट्यांना वर्गणी करून खासगी टॅंकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेला पाणीपट्टी भरूनही पाण्यासाठी खर्च करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक बुर्दंड सहन करावा लागत आहे.
अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने सोसायट्यांच्या टाक्या भरायला जात नाहीत. शहरात 50 आणि त्यापेक्षा जास्त सदनिका असलेल्या सोसायट्यांची संख्या जास्त आहे. आधीच विजेचा खेळ खंडोबा झाला आहे. त्यामुळे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची तारांबळ होत आहे.
विकासकामांमुळे पाणीपुरवठ्यात अडथळे
शहरातील अनेक प्रभागांत विकासकामांचा धडाका सुरू आहे. त्यासाठी करण्यात येणाऱ्या खोदाईत पाइपलाइन फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. परंतु क्षेत्रीय प्रभाग अधिकारी यांच्या असंवेदनशील कारभारामुळे स्मार्ट सिटी, रस्ते विकास, विद्युत विभाग, एमएनजीएल इ. विविध प्रशासकीय कार्यालयाचा एकमेकांशी समन्वय नसल्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना अतोनात हाल सहन करावे लागत आहेत.
‘माकप’कडून आयुक्तांना निवेदन
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा एक दिवसाआड पाणीपुरवठा अजून एक वर्ष सुरू राहील हा निर्णय चुकीचा आहे. शहरातील बहुतांश सोसायट्यांना पाणी मिळत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यांना खासगी टॅंकरवाल्यांकडून पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे महापालिकेने हा निर्णय मागे घेऊन शहरातील नागरिकांना सुरळीत व मुबलक पाणीपुरवठा करावा. हे शक्य नसेल तर महापालिकेने स्वखर्चाने पाणीपुरवठा करावा, पाणी तक्रार नोंदविण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करावी, अशा विविध मागण्या माकपच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे आयुक्तांकडे केल्या आहेत.