जया पुरुषाच्या ठायीं । कर्माचा तरी खेदु नाहीं। परी फलापेक्षा कहीं । संचरेना ।।103।। आणि हें कर्म मी करीन। अथवा आदरिलें सिद्धी नेईन। येणें संकल्पेंहीं जयाचें मन । विटाळेना ।।104।। ज्ञानाग्नीचेनि मुखें । जेणें जाळिलीं कर्में अशेखें । तो परब्रह्मचि मनुष्यवेखें । वोळख तूं ।।105।।
माऊली येथे कर्माने आणि ज्ञानाने परिपूर्ण पुरुषाविषयी विचार प्रतिपादित करतात. ज्या पुरुषाच्या अतःकरणात कर्माविषयी थोडादेखील तिरस्कार, कंटाळा नसतो आणि मनात कर्मापासून प्राप्त होणाऱ्या फलाविषयी काहीच अपेक्षा नसते, हे कर्म मी करीन किंवा आरंभिलेले कर्म सिद्धीला नेईन या कल्पनेनेसुद्धा ज्याचे मन विटाळले गेलेले नाही.
ज्ञानरूपी अग्नीच्या मदतीने ज्याने सर्व कर्मे जाळून टाकली आहेत तो मनुष्याचे रूप धारण केलेला प्रत्यक्ष ब्रह्मच आहे असे तू समज. येथे माऊलींनी ज्ञानाला अग्नीची उपमा दिलेली आहे. काही पंडित विद्वान असतात की, ज्याची सर्व कर्म फलेच्छारहित आणि कर्तृत्वभिमानरहित असतात. त्यांची तुलना माऊली प्रत्यक्ष ब्रह्माशी केली आहे.