भुलेश्वर (पुणे) – गुंजवणीचे पाणी दोन वर्षांत पुरंदरच्या पठारावर आणू आणि पुरंदर उपसा योजना लाभार्थी गावात जलशुद्धीकरण प्रकल्प उभे करणार, असे आश्वासन पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी दिले.
अविश्वास ठरावानंतर माळशिरस येथे झालेल्या ग्रामसभेमध्ये पुन्हा एकदा विजय मिळवल्यानंतर सरपंच महादेव बोरावके यांच्या सत्कार समारंभादरम्यान बोलत होते. यावेळी बेलसर माळशिरस जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय झुरंगे, पंचायत समितीचे बेलसरचे सदस्य सुनीता कोलते, माळशिरसच्या सदस्य सोनाली यादव, कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गणेश जगताप, पुरंदर युवक अध्यक्ष सागर मोकाशी, माउली यादव, विजय गणपत यादव, एकनाथ यादव, बाळू यादव, माळशिरस युवक कॉंग्रेस संदीप यादव व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमा दरम्यान, माळशिरस ग्रामस्थांनी आपल्या विविध मागण्यांची निवेदने आमदार संजय जगताप यांच्याकडे सुपूर्द केली. यामध्ये प्रामुख्याने इंदलकर वस्ती, लिंबाची वाडी, शिरसाई, महाले वस्ती रस्ता आशा विविध कामांचा समावेश होता.
आमदार जगताप म्हणाले की, ज्याप्रमाणे पुरंदरच्या मातीला हजारो वर्षांचा इतिहास आहे, त्याप्रमाणे पुरंदरच्या जनतेला शाश्वत विकास हवा आहे. क्षणिक सुख किंवा आश्वासने नकोत, असे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्यिक दशरथ यादव यांनी तर माळशिरस विविध कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष महादेव यादव यांनी आभार मानले.