Maratha Reservation : राज्यातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. राज्य सरकारकडून मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार सरकारकडून नवा अध्यादेश तयार करून जरांगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.जरांगे यांच्या लढ्याला यश मिळाल्यानंतर आता याबाबत सर्वच स्तरातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. खुल्या वर्गातील गुणवंताच्या जागा टिकवणं ही माझ्यावर जबाबदारी असल्याचे मत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केलं आहे.
जरांगे यांनी केलेल्या मागण्या मान्य केल्यानंतर मराठा बांधवांनी एकच जल्लोष करायला सुरुवात केली. सरकाराने जारी केलेल्या अध्यादेशावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी भाष्य केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाची संरक्षणाची जबाबदारी जयश्री पाटील आणि माझी आहे असं सदावर्ते माध्यमांशी बोलताना म्हणाले.
मनोज जरांगे यांचं ज्ञान काय आहे हे माहिती नाही. जरांगे पाटील कोणत्या लॉ कॉलेजमधून पास झालेले आहेत? असा उपरोधिक सवाल यावेळी सदावर्ते यांनी उपस्थित केला. मराठा समाजातील विद्वान माणसांनी बोललं तर समजू शकतो असं देखील सदावर्ते म्हणाले.
मराठा समाजाचे जे भाऊ आहेत त्यांना ईडब्ल्यूएस आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न आंदोलनाचा आहे, लवकरच उच्च न्यायालयात जाणार असल्याचा इशारा देखील सदावर्ते यांनी यावेळी दिला. कोणतीही बॅकडोअर किंवा फ्रंट डोअर एंट्री कायद्यात नाही. कायद्यात पडताळणी नावाचा प्रकार आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय आहे, की मराठवाड्यातील कुणबी हे मागास नाहीत त्यामुळे सरकार असो की मनोज जरांगे असो कायद्यापेक्षा कुणी मोठा नाही असं स्पष्ट मत सदावर्ते यांनी व्यक्त केलं.