Congress on Nitish Kumar – लोकसभा निवडणुकांपूर्वी देशाच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठे उलटफेर होताना दिसत आहेत. इंडिया आघाडी स्थापन व्हावी यासाठी सर्वप्रथम पुढाकार घेणारे नितीश कुमारचा आता भाजपसोबत हातमिळवणी करण्याच्या तयारीत असल्याने इंडिया आघाडीला मोठा तडा जाणार आहे.
अशातच इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसने बिहारमध्ये सावध पावलं टाकायला सुरुवात केली आहे. काँग्रेसने आपले ज्येष्ठ नेते व छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना बिहार निरीक्षक म्हणून नेमले आहे.
बघेल आजच पटण्यामध्ये दाखल होणार असल्याची माहिती पक्षातर्फे देण्यात आली आहे.
अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच बिहारमधील घडामोडींवर भूमिका मांडू असे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी यावेळी बोलताना म्हंटले.
दरम्यान, नितीश कुमार हे राष्ट्रीय जनता दल व काँग्रेस यांच्यासोबतच्या आघाडीमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरु होती. त्यादिशेने हालचाली सुरु असल्याचेही बिहारमध्ये पाहायला मिळत आहे.
भाजपने दिल्लीहून काही प्रमुख नेत्यांना बिहारमध्ये पाचारण केले असून खुद्द नितीश कुमार यांच्यासमवेत भाजप नेत्यांच्या गाठीभेटी कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या आहेत.
तृणमूलबाबत सावध पवित्रा… । Congress on Nitish Kumar
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पत्रकार परिषद घेत चालू राजकीय घडामोडींवर भाष्य केले. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पश्चिम बंगालमध्ये दाखल झाली आहे.
काही दिवसांपूर्वीच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीसोबत न लढता, ‘एकला चलो री’ची भूमिका घेतली होती.
याच पार्श्वभूमीवर आज, जयराम रमेश यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळाले. ममता बॅनर्जी यांना वगळून विरोधी पक्ष अपूर्ण असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.
काँग्रेस व तृणमूल दोघांचाही भाजपला विरोध आहे अशी आठवण करून देत सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी यांच्या मनात ममता बॅनर्जी यांच्या विषयी आदर असल्याचं त्यांनी सांगितलं.
ममता बॅनर्जी यांनी भारत जोडो यात्रेमध्ये सामील व्हावे असे आवाहनही जयराम रमेश यांनी यावेळी केलं.
उत्तरप्रदेशात जागावाटप अंतिम टप्प्यात? । Congress on Nitish Kumar
उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष व काँग्रेस लोकसभा जागावाटपाच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचल्याचे चित्र आहे. अखिलेश यादव यांनी आज ट्विट करत ११ जागांवर जागावाटप झाल्याचे जाहीर केले आहे.
याबाबत बोलताना जयराम रमेश यांनी, अशोक गेहलोत व अखिलेश यादव यांच्यात बोलणी सुरु असल्याचे सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या…
नितीश कुमार आजच पलटी मारणार? महाराष्ट्रातला बडा नेता बिहारमध्ये…