पेठ परिसरात हरभरा पिकाच्या क्षेत्रात वाढ
पेठ- सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागातील अनेक शेतकऱ्यांचा यंदा हरभरा पीक घेण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे या भागात हरभरा पिकाच्या क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या भागात बटाटा व ज्वारी पीक जास्त असते. मात्र चांगला पाऊस झाल्याने शेतकरी पारंपरिक हरभरा पीके घेण्याकडे वळत असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या 8 ते 10 वर्षात पावसाचे प्रमाण कमी होते.त्यामुळे हरभरा व गहू ही पीके येथील शेतकरी घेत नव्हते. चालू वर्षी पावसाने गेल्या अनेक वर्षाचा विक्रम मोडून मोठ्याप्रमाणात जून ते ऑक्टोबर दरम्यान सतत पाऊस पडत होता, त्यामुळे विहिरी नाले, तळी फुल्ल भरली आहेत. पेठ येथील दत्तात्रय शंकर पवळे, बंटी भगवान पवळे, भावडी येथील गोरक्षनाथ नवले, कुरवंडी येथील दिलीप तोत्रे आदी शेतकऱ्यांनी हरभरा हे पीक घेतले आहे. हरभरा पेरून 45 ते 50 दिवस झाले.तीन दिवसापूर्वी काहीसे ढगाळ वातावरण होते.त्यामुळे हरभरा पिकावर थोडा परिणाम झाला. आता थंडी पडत असल्याने रोगराई हटून हे पीक जोमात आले आहे. जर दरम्यानच्या काळात ढगाळ वातावरण निर्माण झाले तर मात्र घाट्टयांवर अळी निर्माण होऊन हरभरा पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे. सध्या डाळीचे भाव वाढलेले आहेत.