चिंबळी – गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने खेडच्या दक्षिण भागातील शेतकरी खुरपणीच्या कामात व्यस्त आहे. दरम्यान, दमदार पावसामुळे पिकांमध्ये गवताचे बारिक-बारिक तण मोठ्या प्रमाणात वाढल्याने व ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने पिके पिवळी पडली आहे. तर किडी रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने यावर्षी सोयाबीन, भुईमूग, लाल मूग, उडीद आदी पिकांचे उत्पन्न घटणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
जवळपास दीड महिना पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे चिंबळी, कुरुळी, मोई, निघोजे, केळगाव, माजगाव परिसरातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामत घेतलेल्या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात गवताचे तण उगवले होते. मात्र, पाऊस थांबायचे नाव घेत नसल्याने खुरपणीची कामे रखडली होती. मात्र, पावसाने विश्रांती घेतल्याने खुरपणीची कामे वेगाने सुरू असली तरी या भागात शेतमजुरांची मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत असल्यामुळे शेतकरी कुटुंबासह स्वत:च शेतात राबत आहे.