तलाठ्यास मारहाणीचा केला निषेध
राहुरी – राहुरी तालुक्यातील बारागावनांदूर येथील तलाठ्यांना दोन दिवसांपूर्वी वाळू तस्करांनी केलेल्या मारहाण प्रकरणी महसूल कर्मचाऱ्यांनी आज बेमुदत काम बंद आंदोलन करून घटनेचा निषेध केला. याच वेळी संबंधित तलाठी आणि आणखी एकावर छेडछाड व मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेबाबत राहुरी पोलिसांत परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दि. 19 ऑगस्ट रोजी बारागावनांदूर येथील तलाठी संदीप नेहरकर आणि कोतवाल बाचकर हे कार्यालयीन कामकाज चौकशी कामी नवीन गावठाण बारागावनांदूर येथे गेले असता.
त्याठिकाणी दीपक भानूदास आघाव हा त्यांना आडवा आला व म्हणाला की, तू आम्हाला मुरूम का वाहू देत नाही, तुझ्याकडे बघतोच. असे म्हणून शिवीगाळ करू लागला. दीपक आघाव याने त्याच्या हातात असलेले फावडे तलाठी नेहरकर यांच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून कोतवाल बाचकर यांनी नेहरकर यांना बाजूला ढकलल्यामुळे फावडे कमरेला लागून गंभीर दुखापत झाली. यावेळी दीपक आघाव याचा भाऊ सागर भानूदास आघाव व वडील भानूदास रामभाऊ आघाव या तिघांनी मिळून तलाठी नेहरकर व कोतवाल बाचकर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच सागर आघाव याने नेहरकर यांच्या गळ्यात असलेली दोन तोळ्याची सोन्याची चैन हिसकावून घेतली.
नेहरकर यांच्या फिर्यादीवरून दरपक भानूदास आघाव, सागर भानूदास आघाव व भानूदास रामभाऊ आघाव या तिघांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आघाव यांनी तलाठी नेहरकर व कोतवाल बाचकर यांच्यावर छेडछाडीचा तसेच मारहाणीचा खोटा गुन्हा दाखल केला आहे. जोपर्यंत खोटा गुन्हा मागे घेऊन आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत कामकाज बंद राहील, असे महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेच्या वतीने तहसीलदार फसिओद्दीन शेख व पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर पी. जी. सुर्यवंशी, एस. एस. पाडळकर, व्हि. बी. शिंदे, एस. एस. जगताप, डि. आर. गोसावी, ए. एस. देशमुख, बी. के. मंडलीक, एस. व्ही. सावळे, ए. व्ही. शिरसागर आदींच्या सह्या आहेत.