सातारा, (प्रतिनिधी)- पर्यावरणाच्या जगभर होणारया ऱहासामुळे ग्लोबल वार्मिंगचे संकट वाढू लागले आहे. अशा संकटाला तोड देण्यासाठी हिरवाईसारख्या प्रकल्पाची गरज आहे. असे प्रकल्प टिकविण्यासाठी समाजातील धुरिणांनी पुढे येऊन प्रयत्न करण्याचा निर्धार करायला हवा, असे आवाहन येथील सदरबझारमधील हिरवाई प्रकल्पात रविवारी झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमातील प्रमुख वक्त्यांनी केले.
येतील हिरवाई संस्थेच्यावतीने पांडुरंग चौगुले यांच्या स्मृतीपित्यर्थ दिला जाणारा १३ वा हिरवाई पुरस्कार मृणालिनी मनीष निगडे यांना व साताऱयातील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. चित्रा दाभोलकर यांना ज्येष्ठ विचारवंत शास्त्रज्ञ डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर, डॉ. सोमनाथ साबळे, नौदलातील कॅप्टन शिवाजी यादव, संस्थेच्या अध्यक्ष प्रा. संध्या चौगुले, विश्वस्त डॉ. सुनील यादव यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.
त्यावेळी सर्व प्रमुख वक्त्यांनी पर्यावरणाचा ऱहास थांबविण्याची गरज व्यक्त केली. हे काम संघर्षातून उभे राहिले आहेच, पण त्याचबरोबर पांडुरंग चौगुले व संध्या चौगुले यांनी समन्वयातून आणि विविध स्तरातील लोकांचा सहभाग घेऊन उभे केले आहे. या कामाबद्दल डाव्या विचारांकडून आणि उजव्या विचारांकडूनही प्रोत्साहन मिळाले याचा अर्थ कोणत्याही विचाराकडून चांगल्या कामाला पाठबळ मिळते, असे मत डॉ. दाभोळकर यांनी व्यक्त केले.
झाडांची भिशी, पाण्याची भिशी अषा उपक्रमांमधून गृहिणीसुद्धा घरबसल्या सामाजिक काम करु शकते, असे सांगून मृणालिनी निगडे म्हणाल्या, इंटरनेटद्वारे विविध संस्थांची माहिती घेऊन स्वतः ज्ञान मिळवून निसर्ग पर्यावरणासाठी सामाजिक काम करता येते,
संध्या चौगुले यांच्या सातत्य आणि चिकाटीमुळे कठीण परिस्थितीतून हे काम उभे राहिले, असे सांगून डॉ. चित्रा दाभोलकर म्हणाल्या, असे चिकाटीचे प्रयत्न समोर असल्यामुळेच मीही माझ्या कार्यात झोकून देऊन काम केले.
हिरवाईच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होत असताना पर्यावरण वाचविण्यासाठी प्रयत्नांची गरज स्पष्ट झाल्याचे डॉ. सोमनाथ साबळे यांनी सांगितले. हिरवाई प्रकल्प संवर्धनासाठी समाजातील विविध स्तरातील लोकांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. हिरवाई म्हणजे ध्रुवतारा आणि संध्या चौगुले म्हणजे तारकांचा पुंजका आहे, असे शिवाजी यादव यांनी सांगितले.
या पुंजक्यांच्या मदतीतून हिरवाई निर्माण झाली. ती हिरवाई ध्रुवताऱयाप्रमाणे अढळ राहवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दुर्गळवाडीचे सरपंच महिपती यांनी संध्या चौगुले यांच्यामुळे आमचे गाव हागंदारीमुक्त झाल्याची माहिती दिली. सरिता शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. स्वाती राऊत यांनी सूत्रसंचालन केले. तानाजी म्हस्के यांनी आभार मानले.