कर्जत – राज्यात सत्ताबदल होताच कर्जत तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालात प्रा. राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांना धक्का दिला आहे. कर्जत तालुक्यातील कुळधरण, कोरेगाव व बजरंगवाडी या तीनही ग्रामपंचायती राम शिंदे गटाच्या ताब्यात गेल्या आहेत.
राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या कर्जत तालुक्यातील कोरेगाव ग्रामपंचायतमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्याच गावात राष्ट्रवादीला पराभवाला सामोरे जावे लागले. कोरेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने १३ पैकी ७ जागांवर विजय मिळवत ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवले आहे. युवराज शेळके यांच्या नेतृत्वाखाली भाजपने कोरेगाव ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकावला आहे.
कर्जतच्या माजी सभापती पुष्पा शेळके यांचे पती युवराज शेळके यांच्या नेतृत्वाखाली श्री कोरेश्वर ग्रामविकास पॅनलने विजय मिळवला. तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके व कोरेगावचे माजी सरपंच शिवाजी फाळके यांच्या नेतृत्वाखाली श्री कोरेश्वर शेतकरी ग्रामविकास पॅनलने लढत दिली. अटीतटीच्या लढतीत शेळके गटाने बाजी मारली.
दोन्ही गटाचे विजयी उमेदवार
ताई दादासाहेब कोळेकर (३९९), श्रीकांत निवृत्ती वाघ (३४३), शशिकला हनुमान शेळके (४१६), सुषमा विजय पाचपुते (४७३), अंजली विनोद मुरकुटे (५००), रोहिदास विठ्ठल अडसूळ (५१४), मालन शिवाजी मुरकुटे (५२१), जयवंत शिवाजीराव फाळके (६४६), दिलीप राजाराम जाधव (३९०), जयश्री गंगासिंग परदेशी (५८३), बदामबाई भद्रीसिंग परदेशी (५८१), अनिल कुंडलिक शेळके (४८२), मुरलीधर काशिनाथ मुळीक (५०९).
तर बजरंगवाडी ग्रामपंचायतीमध्ये दीपक रुपनर यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने विजय मिळविला आहे. बजरंगवाडी ग्रामपंचायती मध्ये ७ पैकी ५ जागा जिंकत ग्रामपंचायतीवर भाजपच्या गटाने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. तसेच तालुक्यातील कुळधरण ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती, त्यामध्ये ग्रामपंचायतीच्या १३ सदस्यांपैकी त्यापैकी भाजपच्या जगताप गटाकडे सात जागा तर राष्ट्रवादीच्या गुंड गटाकडे सहा जागा असा समझोता झाला होता. दरम्यान तालुक्यातील तीनही ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात गेल्या असल्याने आमदार रोहित पवारांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
जिल्हाध्यक्षांच्या गावातच राष्ट्रवादीचा पराभव –
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांना त्यांच्या गावात आपली सत्ता राखण्यात अपयश आले आहे. जिल्हाध्यक्षांच्या गावातच राष्ट्रवादीचा पराभव झालेले राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीआधी राष्ट्रवादीचा दिग्गज नेत्यांच्या गावातच पराभव झाल्याने आमदार रोहित पवारांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.