मुंबई – विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशनात पार पडावी यासाठी महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांची चर्चा झाली आहे. सरकारच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तसे पुन्हा कळवण्यात येईल. परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल राहिले नसून ते “भाजप’पाल झाले आहेत. त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या? असा सवाल कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.
सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वेगवेगळ्या कारणांमुळे गाजत आहे. कॉंग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्तच आहे. या मुद्द्यावरून नाना पटोले यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे.
नाना पटोले म्हणाले, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनातच व्हावी यासाठी महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल महोदयांना भेटून त्यासंदर्भात कळवण्यातही आलेले आहे. परंतु अद्याप राजभवनवरून अध्यक्षपदाच्या निवडणूक कार्यक्रमासंदर्भात प्रतिसाद आलेला नाही. याविषयी आघाडीतील तिन्ही पक्षांनी चर्चा केली आहे, सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास करून राज्यपाल महोदयांना पुन्हा याबाबत संदेश दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून नेमकी कुणाला उमेदवारी दिली जाईल? याविषयी उत्सुकता ताणली गेली आहे. यासंदर्भात नाना पटोले यांनी उमेदवाराच नाव निश्चित झाले आहे, असे सांगितले.