नवी दिल्ली – शासनाला अस्थिर करण्याचा प्रयत्न राज्यपालांच्या माध्यमातून होत आहे. राज्यपालांनी संविधानाने घालून दिलेल्या चौकटीत राहून काम करणे आवश्यक आहे. सर्वच बिगरभाजप राज्यांसाठी राज्यपाल हे समस्या बनले आहेत. विशेषताः महाराष्ट्राची सर्वात मोठी समस्या राज्यपाल हे आहे, अशा शब्दांत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी टीका केली. या मुद्द्यावरून शिवसेना अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील वाद आता संसदेतही धडकला आहे. या मुद्द्यावरून संसदेत सर्वपक्षीय बैठकीत जोरदार खडाजंगी झाली. पश्चिम बंगालसह महाराष्ट्रानेही या मुद्द्यावरून अधिवेशनात चर्चेची मागणी केली.
खासदार विनायक राऊत म्हणाले, केंद्रशासन नियुक्त राज्यपाल ही महाराष्ट्राची सध्याची सगळ्यात मोठी समस्या आहे. लोकनियुक्त शासनाला अस्थिर करण्याचा प्रयत्न राज्यपालांच्या माध्यमातून होत आहे. राज्यपालांनी संविधानाने घालून दिलेल्या चौकटीत राहून काम करणे आवश्यक आहे. सर्वच बिगरभाजप राज्यांसाठी राज्यपाल समस्या बनले आहेत. याबाबत आपण सभागृहात आवाज उठवणार आहे.
आगामी अधिवेशनात राज्यपाल या विषयावर चर्चा झाली पाहिजे. यासोबतच सर्व मुद्यांवर चर्चा व्हावी अशी विरोधकांची इच्छा आहे. सभागृह बंद पाडण्याची कुठलीही विरोधकांची भूमिका नाही. सरकारने चर्चा नाकारली तर गोंधळ होणारच असे म्हणत पेगाससबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवरील 12 आमदारांची रखडलेली नियुक्ती, महाराष्ट्र सरकारने बदललेला विद्यापीठ कायदा, विधानसभा अध्यक्षांची निवड यासह अनेक मुद्द्यांवरून राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यामध्ये छुपा वाद सुरू आहे. हा वाद आता संसदेपर्यंत पोहोचला आहे.