मुंबई – राज्यात लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता पुन्हा एकदा आमदार-खासदारांच्या घोडेबाजाराच्या चर्चांना उधाण आले आहे. गेल्या चार दिवसांपासून राज्याच्या राजकारणात कोणता आमदार किंवा खासदार फुटणार किंवा कोणाच्या पक्षात जाणार याबाबतची चर्चा सुरू आहे.
दोन दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यामध्ये आमदार – खासदारांच्या फोडाफोडीच्या राजकारणावरून जुंपलेली पाहायला मिळाली. अशातच आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महिन्याभरात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटलेले 40 आमदार घरवापसी करणार असल्याचा दावा केला आहे. ज्यामुळे आता या मुद्द्यावरून आणखी एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
प्रसार माध्यमांसमोर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, पक्षफुटीनंतर दुसऱ्या बाजूला गेलेल्यांवर आता गद्दारांचा शिक्का लागला आहे. गद्दारांची शिक्का लागलेली ही मंडळी आहे. त्यामुळे त्यांना बोलायला जागा नाही. त्यामुळे आता पार्टी संपली आहे. पण ज्यामुळे आता अजित पवारांकडे गेलेले आणि शिंदेकडे गेलेले 40 आमदार घरवापसी करतील अशी परिस्थिती आहे. काही आमदार संपर्क साधत असल्याची माहिती आहे. चर्चा जोरात आहेत कारण वारे हे महाविकास आघाडीच्या बाजूने वाहू लागले आहेत, असा दावा वडेट्टीवारांकडून करण्यात आला आहे.
भाजपासोबत घेते पण पक्ष संपवते, हे अजित पवारांना आता समजलं असेल, असा टोला काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला. उद्धव ठाकरेंना समजलं तसं ते दूर गेले. भाजप हा बेईमानांचा पक्ष आहे. उपयोग झाला की फेकून द्यायचं ही त्यांची नीती आहे, असा घणाघाती हल्ला विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.