नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांतील घटनांनंतर डीपफेकच्या (Deepfake) मुद्द्यावर चिंता व्यक्त केली जाते आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही याबाबत आपली भूमिका मांडत चिंता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर आता माहिती आणि तंत्रज्ञान अर्थात आयटी खात्याचे मंत्री अश्वीनी वैष्णव यांनी मोठे विधान केले आहे. सरकार लवकरच या विषयावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जर सोशल मीडियाने डीपफेक हटवण्यासाठी (Remove Deepfake) पुरेसे उपाय केले नाहीत तर त्यांना सेफ हार्बर अंतर्गत जी सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे ती हटवली जाईल असा इशारा देतानाच वैष्णव म्हणाले की सरकारने अलिकडेच डीपफेकच्या मुद्द्यावरून कंपन्यांना नोटीस जारी केली असून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मस्ने त्याचे उत्तरही दिले आहे.
मात्र त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून झळकणाऱ्या अशा आक्षेपार्ह सामग्रीच्या विरोधात त्यांना आणखी आक्रमक भूमिका घ्यावी लागणार आहे. ते काही पाउले उचलत आहेत. तथापि, आणखी कृती करण्याची गरज आहे. लवकरात लवकर म्हणजे तीन चार दिवसांत आम्ही त्या सगळ्यांची बैठक घेणार आहोत. त्यात या सगळ्यावर विचार केला जाईल आणि डीपफेक रोखण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले जातील.
मेटा आणि गुगल (Meta Google) यांना बैठकीला बोलावले जाणार आहे का असे विचारल्यावर वैष्णव यांनी सकारात्मक उत्तर दिले आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पुरेशी कारवाई करत आहेत तोपर्यंतच त्यांना सेफ हार्बर इम्युनिटी कायम राहील. जर त्यांनी पुरेसे उपाय केले नाहीत तर ती इम्युनिटी अर्थात सुरक्षा राहणार नाही.