पुणे – आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधीनंतर खातेवाटपावरून सुरू असलेल्या वाद या कारणांमुळे जेजुरी (ता.पुरंदर) येथे होणारा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम दोनदा पुढे ढकलण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार होते. याठिकाणी मोठे शक्तीप्रदर्शन होणार असल्याने जय्यत तयारी प्रशासनाने केली होती. संपूर्ण तयारी झालेली असतानाही ऐनवळी या कार्यक्रम रद्द झाल्याने प्रशासनाने केलेला खर्च वाया गेला असून सर्व नियोजनावर पाणी फिरले आहे. यामुळे लाभार्थ्यांना दाखले आणि शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.
जेजुरी (ता. पुरंदर) येथे गुरुवारी (दि.13) शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्या संकल्पनेतून शासन आपल्या दारी या उपक्रम राज्यातील सर्वच तालुक्यात राबविण्यात येत आहे. शिवसेना सोडून शिंदे गटात दाखल झालेल्या आमदार, खासदार यांच्या मतदारसंघात प्रामुख्याने होणाऱ्या कार्यक्रमास मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहत आहे. यामधून आपल्या समर्थकांना ताकद देण्याचा प्रयत्न शिंदे करत आहेत.
पुरंदर येथील माजी आमदार शिंदे गटात दाखल झाल्याने त्यांनी आपल्या मतदारसंघात हा कार्यक्रम घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले. यापूर्वी दि.3 जुलै रोजी हा कार्यक्रम होणार होता. मात्र, उपमुख्यमंत्री म्हणून दि.2 जुलैला अजित पवार यांनी शपथ घेऊन सरकारमध्ये सामिल झाल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडून दि.13 जुलै ही तारीख देण्यात आली. मात्र शपथविधी होऊन 10 दिवस होऊन खातेवाटप झाले नाही. या खातेवाटपावरून नाराजी असल्याने तसेच निर्णय होत असल्याने पवार यांनी दिल्ली गाठली आहे. त्यामुळे गुरुवारी होणारा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.
या कार्यक्रमासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या तीनही पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन करण्यात येणार होते. त्यानुसार तयारी सुरू करण्यात आली होती. जिल्ह्यातील प्रत्येक गावातील सरपंच आणि सदस्य, तालुका स्तरावरील पक्षांचे पदाधिकारी यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. यासाठी एसटी सुध्दा बुक करण्यात आल्या होत्या. तसेच ज्या लोकांना थेट लाभ देण्यात येणार होता.
बेरोजगारांचा हिरमोड…
जेजुरी येथील या कार्यक्रमात रोजगार मेळाव्याचे सुध्दा आयोजन करण्यात आले होते. यासाठी कंपन्यासुध्दा उपस्थित राहणार होत्या. या मेळाव्यात सुमारे पाच हजार जणांना नोकरी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. थेट जागेवरच नियुक्ती पत्र देण्याचे नियोजन करण्यात आले होते. बेरोजगारी वाढत असल्याच आरोप होत असताना त्यावर रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार देण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, या मेळाव्यात रोजगार मिळेल, असे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.