Manoj Jarange – मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या पाच महिन्यांपासून मराठा आंदोलनाची ज्योत तेवत ठेवली होती. तसेच, मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत मी माझ्या भूमिकेवर ठाम असल्याचेही जरांगे यांनी मराठा बांधवांना सांगितले होते.
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जरांगेंनी मोठा त्यागदेखील केला. ज्या दिवसापासून आंदोलनाची धग पेटवली, तेव्हापासून जरांगे पाटील आपल्या घरी गेलेले नाहीत.
आज मराठा समाजाला न्याय मिळाल्यानंतर मनोज जरांगेंच्या कुटुंबियांनी आनंद साजरा केला आहे. समाजाला आता आरक्षण मिळाले असून जरांगे पाटलांनी आपल्या घरी परत यावं, अशी आर्त हाक त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. या आंदोलनाचे श्रेय हे आपले वडील आणि लाखो मराठा बांधवांना जात असल्याची प्रतिक्रिया जरांगेंच्या मुलीने दिली आहे.
जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने आंदोलनासाठी निघाले होते. त्यावेळी जालन्याजवळ जरांगे पाटीलांच्या कुटुंबियांनी त्यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांचे कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते. तसेच त्यांच्या मुलीने वडीलांनी आरक्षण घेऊन परत येण्याची मागणी त्यांच्याकडे केली होती.
तसेच जरांगे पाटील भावूक होत म्हणाले होते की, माझ्यासाठी केवळ माझे मराठा बांधव हेच माझं कुटुंब आहे. त्यामुळे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मी परतणार नसल्याचा निर्धार त्यांनी जाहीर केला होता.