मुंबई – मुंबईतील करोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे राष्ट्रीय प्रमाणापेक्षा अधिक चांगले आहे, असे अधिकृत आकडेवारीवरून निष्पन्न झाले आहे. मुंबईतील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 70 टक्के इतके असून ते राष्ट्रीय प्रमाणापेक्षा 7 टक्क्यांनी अधिक आहे.
केंद्र सरकारच्याच पीआयबी या संस्थेमार्फत जी आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे त्यातून हे निष्पन्न झाले आहे. त्यात नमूद करण्यात आले आहे की देशातील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 63 टक्के इतके आहे तर मुंबईतील हे प्रमाण 70 टक्के इतके आहे.
मुंबई वगळता महाराष्ट्राच्या अन्य भागातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मात्र जेमतेम 55.62 टक्के इतके आहे. त्या प्रमाणापेक्षाही मुंबईतील हे प्रमाण जवळपास 15 टक्क्यांनी अधिक आहे. मुंबईत सध्या करोनाच्या ऍक्टिव्ह केसेस 24 हजार 307 इतक्या असून बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 67 हजार 830 इतकी आहे. मुंबई महापालिकेने मिशन झिरो ही मोहीम राबवल्यानंतर मुंबईतील करोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.