Railway Ticket: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या तिकीट दरात कपात केली आहे. कोरोना संकटात रेल्वे प्रशासनाने काही सवलती बंद केल्या होत्या. तसेच प्रवाशांनी वाढती गर्दी लक्षात घेता काही गाड्या बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. या गाड्या बंद केल्यानंतर उत्पन्न वाढवण्यासाठी रेल्वेकडून तिकीट दरात वाढ करण्यात आली होती. या तिकीटदर वाढीचा मोठा फटका प्रवाशांना बसला होता.
यानंतर आता देशभरातील ‘एक्स्प्रेस स्पेशल’ किंवा मेमू ट्रेनच्या गाड्यांसाठी भाडे कपात लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत रेल्वेच्या तिकीट दरात सुमारे 40 ते 50 टक्क्यांनी घट झाली आहे. कोविड-19 महामारीच्या काळात प्रवासी गाड्या तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या होत्या. त्या पुन्हा सुरू झाल्यावर किमान तिकिटाची किंमत 10 रुपयांवरून 30 रुपये करण्यात आले होते.
तिकीट दरात कपात करण्याची प्रवाशांची मागणी
परंतु लॉकडाऊन आणि कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर वाढलेले तिकीट दर कमी करावे, अशी मागणी अनेक दिवसांपासून प्रवाशांकडून केली जात होती. प्रवाशांनी मागणी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने आता तिकीटदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
मेमू ट्रेनच्या गाड्यांसाठी भाडे कपात
सर्व मेमू ट्रेन आणि शून्यापासून सुरू होणाऱ्या क्रमांकाच्या रेल्वे गाड्यांच्या तिकिट दरात नव्या निर्णयानुसार सुमारे 50 टक्के तिकिट दर कमी होणार आहे. 27 फेब्रुवारीपासून पॅसेंजर ट्रेनचे सामान्य द्वितीय श्रेणीचे भाडे भारतीय रेल्वेने पूर्ववत केले आहे. अनारक्षित तिकीट प्रणाली ॲपमधील भाडे रचना देखील त्यानुसार बदलण्यात आली आहे. तिकिट दर कमी करण्याच्या निर्णयाचा सर्वाधिक फायदा रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. या निर्णयानंतर प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.