सातारा, (प्रतिनिधी) – सातारा जिल्ह्यात 7 मे रोजी 2315 मतदान केंद्रावर अठरा लाख 89 हजार,740 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून खऱ्या अर्थाने लोकशाहीचा उत्सव साजरा करणार आहे. नागरिकांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडून 100% मतदानाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले आहे. जिल्हा प्रशासनाच्या तयारीची जिल्हाधिकारी डुडी यांनी माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, सातारा लोकसभा मतदारसंघात 18 लाख 89 हजार 740 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये नऊ लाख 59 हजार सतरा पुरुष, नऊ लाख तीस हजार 647 स्त्रिया व 76 तृतीय पंथीय मतदारांचा समावेश आहे.
महाबळेश्वर वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक तीन लाख 41 हजार 714 मतदार आहेत आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एका पथकास दोन बीयू , व्हीव्हीपॅट मशीन, मतदार यादी, मतपत्रिका 32 प्रकारचे साहित्य असलेली बॅग देण्यात येणार आहे. 463 शाई बाटल्या, 46 हजार 300 मतदार पत्रिका उपलब्ध करण्यात आले आहेत.
आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी 156 पथके स्थापन करण्यात आली आहेत. संबंधित वाहनांना जीपीएस प्रणाली आहे. या पथकांकडून उमेदवार राजकीय पक्ष व त्यांच्या कार्यकर्त्यांना लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच निवडणूक काळात मतदारांना पैसे दारू व इतर वस्तूंचे वाटप करून मतदारांना प्रभावित करू नये यासाठी ही पथके तैनात आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघात 2, 315 मतदान केंद्रे आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडून येण्यासाठी 118 मतदान केंद्रावर सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. तसेच 17 मतदान केंद्रे ही विशिष्ट संकल्पनेवर आधारित असून ती मतदारांच्या आकर्षणाचा विषय ठरणार आहेत.
राज्यात सर्वाधिक तरुण मतदार सातारा जिल्ह्यात
उन्हाच्या झळा टाळण्यासाठी मतदान केंद्रावर मंडप उभारण्यात आले आहेत. पंख्याची व्यवस्था तसेच मोबाईल हेल्थ पथक हेल्थ वर्कर यांची सोय करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर लांब रांगा असतील तर मतदानासाठी खुर्च्यांची सोय सुद्धा करण्यात आली आहे. प्रत्येक 50 घरामागे एक अधिकारी नेमण्यात आला असून हे अधिकारी घरोघरी शंभर टक्के मतदान करा, असे आवाहन करणार आहे.
सातारा जिल्ह्याला सैनिकी परंपरा आहे. जिल्ह्यात 12,800 सैनिक कार्यरत असून ते पोस्ट मतदार आहेत. सवाई माधवपुर राजस्थान येथे देशात सर्वाधिक पोस्टल मतदार आहेत. जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात मतदार नोंदणी मोहीम राबवण्यात आली होती. जिल्ह्यात सुमारे 50,000 युवा मतदार आहेत. राज्यात सर्वाधिक तरुण मतदार सातारा जिल्ह्यात आहेत. हे युवा मतदार प्रथमच मतदान करणार आहेत.
निर्भयपणे मतदान करावे
नागरिकांनी सकाळी सात ते सहा या वेळेत निर्भयपणे मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. सातारा जिल्ह्यात लोकसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी 16,800 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांचे विविध टप्प्याने प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान टक्का वाढवण्यासाठी 1500 पदके स्थापन करण्यात आले असून त्यामध्ये आठ हजार पाचशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.