पाचगणी, (प्रतिनिधी) – शेतकर्याच्या मुलाने हेलिकॉप्टरमधून फिरू नये, असा कायदा आहे का? मी शेतकर्याचा मुलगा असून, वेळ वाचावा म्हणून, सरकारी हेलिकॉप्टरने शेतात जातो. तेथे अधिकारी, पदाधिकारी, शेतकर्यांशी संवाद साधून प्रश्न सोडवतो. मुख्यमंत्री झालो, तरी माझ्या डोक्यात हवा जाऊ दिलेली नाही. माझे पाय नेहमी जमिनीवर असतात आणि ते आपोआप शेतीकडे वळतात. हेलिकॉप्टरमधून जाऊन, फोटोग्राफी करण्यापेक्षा शेती केलेली काय वाईट, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांचे नाव घेता लगावला.
पाचगणी येथील एमआरए सेंटरच्या सभागृहात रविवारी झालेल्या ‘स्ट्रॉबेरी विथ सीएम’ या कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, भूषण गगराणी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, विकास शिंदे, पाचगणी पालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव, प्रवीण भिलारे, संजय गायकवाड, गणपत पार्टे, किसनशेठ भिलारे, नितीन भिलारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, महेश रसाळ, स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
वसंतदादा पाटील यांच्यानंतर शेतकरी व सर्वसामान्यांशी नाळ जोडलेला मुख्यमंत्री म्हणून तुमच्याकडे पाहिले जाते. शेतकर्यांच्या कल्याणासाठी काय सांगाल, असे विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले, राज्य सरकार शेतकर्यांसाठी अनेक योजना राबवत आहे. सर्वसामान्यांची दुःखे, अडचणी, त्रास मी जवळून पहिला आहे. ‘मी बघतो, करतो’ हे शब्द माझ्या डिक्शनरीत नाही. मी स्वत:ला मुख्यमंत्री नाही, तर कॉमन मॅन समजतो. लोकांना भेटणे हा माझा छंद आहे. घरात, मंत्रालयात बसून मी ‘फेसबुक लाइव्ह’ करत नाही. लोकांना थेट ‘फेस’ करतो. शेतकर्यांच्या बांधावर, शेतावर जातो.
आमच्या गावाचीच नव्हे, तर संपूर्ण सातारा जिल्ह्याची हवा, पाणी, पर्यावरण शुद्ध आहे. महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी एक नंबर आहे. येथील मुले नोकरी, धंद्यासाठी मुंबईला जातात. ती गावाला पुन्हा आली पाहिजेत. आधुनिक पद्धतीने शेती करून या मुलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे. स्ट्रॉबेरीचा रंग आणि चव दोन्ही आवडते.
शेतकरी व शेती अडचणीत आल्याबाबत विचारले असता, ते म्हणाले, हे सरकार शेतकर्यांचे आहे. अवकाळी, गारपीट, विपरीत हवामानामुळे होणार्या शेतीच्या नुकसानीची भरपाई दुप्पट केली आहे. केंद्राकडून शेतकर्यांना वर्षाला सहा हजार आणि राज्य सरकारचे सहा हजार मिळून 12 हजार रुपये दिले जात आहेत. बळीराजाला जी मदत आवश्यक आहे, ती आपण करत आहोत.
शेती आणि राजकारणामधील आव्हानांबाबत त्यांनी सांगितले की, शेतीमध्ये मोठी आव्हाने आहेत. अवकाळी, गारपीट, ग्लोबल वॉर्मिंग यामुळे शेतकरी अडचणीत येतो. त्यासाठी झाडे लावून पर्यावरण वाचवले पाहिजे. राजकीय आव्हान आले की आम्ही शिंगावर घेतो. दीड-पावणेदोन वर्षांपूर्वी जे आले, तेदेखील आम्ही अंगावर आणि शिंगावरही घेतले. सातारा जिल्हा धाडसी लोकांचा आहे.
निवेदने न स्वीकारल्याने लोकांचा भ्रमनिरास
मुख्यमंत्र्यांचा आजचा दौरा धावपळीचा होता. ‘स्ट्रॉबेरी विथ सीएम’ या कार्यक्रमावेळी त्यांना समस्यांची निवेदने देण्यासाठी महाबळेश्वर तालुक्यातील अनेक ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते; परंतु मुख्यमंत्र्यांनी एकही निवेदन न स्वीकारल्याने नागरिकांचा भ्रमनिरास झाला.
विद्यार्थी आनंदले
रविवारची सुट्टी असूनही, विविध शाळांचे विद्यार्थी मुख्यमंत्र्यांना भेटायला आले होते. विद्यार्थ्यांच्या गराड्यात मुख्यमंत्री रमले. त्यांनी हस्तांदोलन केल्याने विद्यार्थी आनंदून गेले.