मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा -विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींना पराभूत करण्याचा विचार करीत असले तरी शेळ्या मेंढ्या जंगलातील सिंहाशी लढू शकत नाहीत, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
श्रीनगरमधील एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना शिंदे म्हणाले की,” मी विरोधी पक्षांना गिधाडे म्हणणार नाही, पण शेळ्या-मेंढ्या एकत्र येऊन जंगलात सिंहाशी लढा देऊ शकत नाहीत. सिंह हा नेहमीच सिंह असतो आणि तो जंगलावर राज्य करतो. विरोधक फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींना पराभूत करण्याचा विचार करतात. पण मला या स्पर्धेत ते कुठेही उभे राहिलेले दिसत नाहीत.”
भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला आव्हान देण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येत असल्याबद्दल विचारले असता, शिंदे म्हणाले की, विरोधक फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींना पराभूत करण्याचा विचार करतात.पण मला कोठेहीं ते प्रभावीपणे कार्यरत झालेले पहायला मिळत नाहीत.” महाराष्ट्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या स्थितीवर भाष्य करताना शिंदे म्हणाले, “अजित पवारांनी आमच्यात सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर माझ्या सरकारला (भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीचा अजित पवार गट) 215 हून अधिक आमदारांचा पाठिंबा आहे. सरकारला कोणताही धोका नाही.”
उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता शिंदेंनी साधला निशाणा
उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता शिंदे म्हणाले की, आम्ही लोकांसाठी काम करत आहोत. लोक ठरवतील की त्यांना त्यांच्यासाठी काम करणारा कोणी हवा आहे की फक्त घरी बसणारा. विरोधी नेत्यांना टार्गेट करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाचा वापर केला जात असल्याच्या आरोपावर विचारले असता शिंदे म्हणाले, भ्रष्ट कारभारात गुंतल्याचा संशय असलेल्यांवर ईडी कारवाई करते. ते तसे अन्य कुणाला त्रास देत नाहीत.