मुंबई -उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटाचं सध्या चांगभलं सुरू आहे. त्या गटाला पॉवर मिळण्यामागे अनेक राजकीय अर्थ दडलेले आहेत. राष्ट्रवादीच्या गटाला सत्तेत एन्ट्री मिळण्याबरोबरच मनासारखी खातीही लाभली आहेत. त्यामुळे तो गट सुखावणार असला; तरी सत्तेतील दुसरा भागीदार दुखावणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या राज्याच्या सत्तेत भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा गट आणि राष्ट्रवादीचा गट असे तीन भागीदार आहेत. संख्याबळाचा विचार करता त्या भागीदारांमध्ये भाजप खरेतर सर्वांत मोठा भाऊ. तसे असूनही भाजप दोन्ही लहान भावांना मोठेपणा देण्याचे अनाकलनीय औदार्य दाखवत आहे.
वर्षभरापूर्वी भाजप आणि शिंदे गटाने एकत्र येऊन सरकार स्थापन केले. त्यावेळी भाजपने त्याग करून शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. पाठिशी लहान पक्ष, अपक्षही उभे असल्याने त्या सरकारकडे आवश्यकतेपेक्षाही अधिक बहुमत होते. तसे असूनही चालू महिन्याच्या प्रारंभी सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या गटाच्या रूपाने तिसऱ्या भागीदारालाही सामावून घेतले गेले. ती घडामोड प्रामुख्याने भाजप आणि राष्ट्रवादी गटामधील समझोत्यामुळेच घडली. त्या घडामोडीमध्ये शिंदे गटाचा फारसा सहभाग नसल्याचे जाणवत राहिले. एवढेच नव्हे तर, सत्तेत आणखी एक भागीदार आल्याने शिंदे गट अस्वस्थ बनल्याचे दडून राहिले नाही.
अर्थात, राष्ट्रवादीच्या गटाचा स्वीकार करून पुढची वाटचाल करण्याची मानसिकताही शिंदे गटाने दाखवली. मात्र, त्या गटाने एक आग्रही भूमिकाही घेतल्याचे बातम्यांमधून पुढे येऊ लागले. ती भूमिका म्हणजे अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याची सुत्रे न देणे. शिंदे गटाने वर्षभरापूर्वी बंडासाठी विविध कारणे दिली. त्यामधील एक कारण म्हणजे आधीच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थ खाते सांभाळणाऱ्या अजित पवार यांनी निधी वाटपात केलेला कथित भेदभाव. शिंदे गटाच्या विरोधामुळे अजित पवार यांना यावेळी वेगळे खाते मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण, शिंदे गटाच्या विरोधाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. साहजिकच, त्या गटाची अस्वस्थता आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.
तूर्त तरी सत्तेतील नव्या भागीदाराला (राष्ट्रवादीचा गट) झुकते माप देण्याचे धोरण भाजपने अवलंबलेले दिसते. त्या गटाला सत्तेत सामावून घेतले गेल्यापासूनच वेगवेगळे अंदाज राजकीय विश्लेषक लावत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीचा विचार करून भाजप जुळवत असलेली राजकीय समीकरणे, विरोधकांना नामोहरम करण्याची रणनीती, राजकीय वजन असणारे नेते विरोधात राहणार नाहीत याची दक्षता या अनुषंगाने ते अंदाज आहेत. निवडणूक जसजशी जवळ येईल; तसतशी राजकीय कोडी उलगडत जातील, त्यांचा अर्थ लागेल.