मुंबई – राज्यात सत्तांतराला वर्षपूर्ती झाली असून महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून सातत्याने करण्यात आला आहे. शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात आज थोड्याच वेळात मुंबई महापालिका प्रशासनाच्या कारभारातील भ्रष्टाचाराच्या विरोधात महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे.
मुंबई महापालिकेत वर्षभरापासून नगरसेवक नाहीत. मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हातात आहे आणि त्यामुळेच मुंबई महापालिकेच्या प्रशासकीय कारभारात हजारो कोटी रुपयांचे घोटाळे होत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून वेळोवेळी करण्यात आला आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आजच्या मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, या विराट मोर्चाआधी मुंबईतील वातारवण दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मुद्द्यावरुन तापलेले दिसते आहे. हा मोर्चा निघण्याआधी मुंबई महानगरपालिकेच्या आवारात सुशांतसिंहच्या नावाचे फलक लावण्यात आलेत. महानगरपालिकेच्या आवारासोबतच मुंबईत इतर ठिकाणीही ही बॅनरबाजी पाहायला मिळाली आहे.
मात्र, यामध्ये काही बॅनर असेही आहेत, ज्यावर सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिला न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे. आता ऐन मोर्चाच्या आधी हे बॅनर लावण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.