कर्जत, (प्रतिनिधी): कुठलीही गायी कत्तलखान्यात जाणार नाही, यासाठी गोसेवा आयोग, आदी जिन ट्रस्ट, समस्त महाजन या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्याला त्या गायीचा मोबदला दिला जाईल. तेव्हा कोणतीही गायी कत्तलखान्यात न पाठवता गोशाळेत सोडण्याचे आवाहन अॅनिमल वेल्फेअर बोर्डचे सदस्य इंजि. यश शहा यांनी केले.
यशोदानंद गोशाळेचा चतुर्थ वर्धापन दिन साजरा झाला. या कार्यक्रमासाठी राशीनच्या सरपंच नीलम साळवे, नवीन बोरा, बाप्पु धोंडे, समीर दोशी, गणेश अंनबुले, कुंडलिक सायकर, प्रितम शहा, अप्पासाहेब नाळे, हभप श्रीकांत पावणे महाराज, मोती महाराज सोनवणे, सायकर महाराज, दीपक बेलेकर, योगेश शर्मा, अर्जुन राऊत, बालयोगी महाराज, नवनाथ धनवे, गोसेवक तात्यासाहेब क्षीरसागर ,निमिश दुगड आदी मान्यवर उपस्थित होते.
यानिमित्त कुंभारगाव अॅग्रो या शेतकरी गटाला आदर्श सेंद्रिय शेती, अरविंद कापसे यांना आदर्श देशी गोपालक, केशव शिंदे यांना शिक्षणमहर्षी, डॉ. नितीन खरात यांना आदर्श डॉक्टर तर माऊली कदम यांना आदर्श उद्योजक म्हणून पुरस्कारीत करण्यात आले.
गोशाळेमध्ये दिवसेंदिवस गायीची संख्या वाढत असल्याने गायींच्या निवाऱ्यासाठी मुंबई येथील श्री आदी जिन ट्रस्टच्या वतीने शेड देण्यात आले. त्याचा भूमिपूजन समारंभ संस्थेचे कॉर्डिनेटर, इंजि.यश शहा यांच्याहस्ते संपन्न झाला. गोशाळा बनणारे विविध उत्पादने यांची खरेदी करून गोमय उत्पादनचा आपल्या दैनंदिन वापरात आणावा, असे आवाहन केले. यावेळी हभप राऊत महाराज यांचे कीर्तन झाले. सूत्रसंचालन डॉ. विलास राऊत यांनी तर आभार संस्थेचे अध्यक्ष मिलिंद राऊत यांनी मानले.
शेणापासून बनविलेल्या वस्तूचे प्रदर्शन
गोशाळा स्थापन झाल्यापासून विविध मान्यवरांचे आजवर सहकार्य, मार्गदर्शन लाभले. त्या सर्वाच्या सहयोगाने ही गोशाळा चालवत असून गोशाळा स्वावलंबन करण्याच्या प्रयत्नातून शेणापासून विविध वस्तूंची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्याचे प्रदर्शन आज याठिकाणी मांडण्यात आले होते. उपस्थित सर्वांनी या वस्तूंचे कौतुक करत खरेदी केली. भविष्यात गोशाळा व महिला बचतगटाच्या माध्यमातून या वस्तूंचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे निकिता राऊत यांचा मानस आहे.