शैक्षणिक वर्षापासून वसतिगृह उपलब्ध होण्याची चिन्हे : गेल्या एका वर्षांपासून होते काम ठप्प
पुणे – गेल्या एक वर्षापासून काम ठप्प असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थिनींसाठी नवीन वसतिगृहाचे काम प्रगतीपथावर असून आतापर्यंत वसतिगृहाचे निम्मे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून मुलींना हे वसतिगृह उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत.
सध्याच्या मुलींच्या वसतिगृहामागे नवे वसतिगृह उभारण्यात येत आहे. मात्र, तेथील राडारोडा न काढल्याने काम ठप्प होते. देशात पारंपरिक विद्यापीठात अव्वल येण्याचा मान मिळविलेल्या पुणे विद्यापीठाचे मुलींच्या नवीन वसतिगृह बांधकाम करण्याविषयी फारसे गंभीर नसल्याचे वृत्त दै. “प्रभात’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाकडून तातडीने आढावा घेत वसतिगृहाच्या कामास सुरुवात करण्यात आली. त्याचे काम आता वेगाने सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
तत्कालीन कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी 13 फेब्रुवारी 2017 मध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या मुलींच्या वसतिगृहाच्या पाठीमागे नवे वसतिगृहाचे भूमिपूजन केले. त्यानंतर त्या जागेवरील असलेले सेवक वसाहतील लोकांना अन्य ठिकाणी हलविण्यात आले. मात्र त्यापुढे काहीच कार्यवाही झाली नव्हती. याबाबत विद्यापीठावर टीका होत होती. त्यानंतर आता कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी मुलींच्या नव्या वसतिगृहाच्या कामात लक्ष घातल्याचे दिसून येत आहे.
विद्यापीठात मुलींच्या नव्या वसतिगृहाचे बांधकाम विनाखंड सुरू आहे. स्थावर विभागाकडून वसतिगृहाचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यात वसतिगृहाच्या बांधकामासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत केली जात असून येत्या सहा महिन्यांत या वसतिगृहाचे काम पूर्ण होईल.
– आर. व्ही. पाटील, कार्यकारी अभियंता, पुणे विद्यापीठ
प्रशासनाने केली होती चालढकल
नवीन मुलींचे वसतिगृह पाच मजली आहे. त्यात सुमारे 200 मुलींना राहण्याची सोय होती. तब्बल 5 कोटी रुपयांची तरतूद असतानाही विद्यापीठ प्रशासनाने चालढकल केली होती. त्यावर सिनेट सदस्यांनी संताप व्यक्त केला होता. एवढेच नव्हे, तर विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या अन्य देशातील विद्यार्थ्यांसाठी नवीन वसतिगृह बांधण्यात येत आहे. त्याचे बांधकाम योग्य पद्धतीने सुरू आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे वसतिगृहाचे बांधकाम पूर्ण होत आहे. सावित्रींच्या लेकींसाठी मात्र विद्यापीठ दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात आला होता.