नवी दिल्ली: दिल्लीत झालेल्या बांगलादेशविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. शिखर धवनसह मधल्या फळीतील फलंदाजांना आलेल्या अपयशावर लिटील मास्टर सुनील गावसकर यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. कामगिरीत सुधारणा करा अन्यथा संघातील स्थान गमवावे लागेल, असा सल्लावजा कानपिचक्या संघात पुनरागमन केलेल्या सलामीवीर शिखर धवनला गावसकर यांनी दिल्या आहेत.
शिखर धवनने या सामन्यात 42 चेंडूत 41 धावांची खेळी करत भारतीय संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावसकर शिखरच्या या कामगिरीवर समाधानी नाहीत.
पुढील सामन्यांमध्ये शिखरच्या खेळात सुधारणा झाली नाही तर संघातल्या त्याच्या स्थानाबद्दलही प्रश्न विचारले जातील, असा इशारा गावसकर यांनी दिला आहे. 40-45 चेंडू खर्च करून तुम्ही तितक्याच धावा करणार असाल तर त्याचा संघाला कोणताही लाभ होणार नाही.
शिखरला आता आपल्या खेळाबाबत गंभीरपणे विचार करावा लागेल. जेव्हा एखादा खेळाडू संघात पुनरागमन करतो, तेव्हा त्याला मैदानावर स्थिरावण्यास वेळ जातो, मात्र इथेच तुमचा अनुभव कामी येतो. शिखरच्या फलंदाजीकडे पाहताना त्याला अनुभव आहे असे कुठेही जाणवले नाही, हेच त्याच्यासाठी धोकादायक आहे, असे गावसकर यांनी व्यक्त केले आहे.