सरकारी नियम डावलण्याच्या हट्टातून परीक्षा दोन वर्षांपासून रखडली
पुणे – राज्यातील नामांकित आणि अग्रेसर असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने अर्थात पीडीसीसी बॅंकने लेखनिक पदासाठी अर्ज मागविले. मात्र, विशिष्ट संस्थेद्वारे भरती प्रक्रिया राबविण्याच्या हट्टामुळे गेल्या दोन वर्षांपासून ही परीक्षा रखडली आहे. अर्ज भरुनही अजून परीक्षेची तारीख निश्चित नाही, यावरुन अर्ज केलेल्या उमेदवारांकडून पीडीसीसी बॅंकेच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त करण्यात येत आहे, त्यांच्या कुठल्याही प्रश्नांना उत्तरे देणे टाळले जात असल्याने बॅंकेच्या या प्रक्रियेतील गौडबंगाल काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जिल्हा बॅंकेने जुलै 2021 मध्ये लेखनिक पदाच्या 356 जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली. या परीक्षेसाठी तब्बल 31 हजार उमेदवारांनी अर्ज भरले. परीक्षेसाठी बॅकेकडून एका खासगी एजन्सीची नियुक्ती केली. दरम्यान, राज्य शासनाने सहकारी बॅंकांमधील नोकरभरती प्रक्रिया फक्त आॅनलाइन पद्धतीने राबविण्याचे आदेश दिले. तसेच, सहकार आयुक्तांनी तयार केलेल्या अधिकृत एजन्सी पॅनेलमधील संस्थेकडेच नि:पक्ष व पारदर्शक पध्दतीने परिक्षा घेऊनच नोकरभरती करावी, अशा सूचना शासनाने दिल्या, असे असतानाही एका खासगी एजन्सीमार्फतच भरती प्रक्रिया राबविण्याचा हट्ट जिल्हा बॅकेने धरला.
सहकार विभागाकडूनही बॅंकेने मार्गदर्शन मागविले. यामध्ये सहकार विभागाने सुद्धा टीसीएस आणि आयबीपीएस मार्फत ही परीक्षा घ्या, अशा सूचना दिल्या. सहकार विभागाने दोन वेळा अभिप्राय देऊनही जिल्हा बॅंकेने याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे जिल्हा बॅंक भरती उमेदवारांसाठी एक मृगजळ ठरली आहे. एका विशिष्ठ संस्थेमार्फत भरती प्रक्रियेच्या हट्टापायी ही भरती प्रक्रिया लांबल्याची चर्चा उमेदवारांमध्ये सुरु आहे. कोणाच्या तरी सुगीच्या दिवसांसाठी हजारो उमेदवारांना का वेठीस धरले जात आहे ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, राज्यातील एका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेनेही त्यांच्या स्तरावर परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र उच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश असल्यामुळे संबंधित बॅंकेने टीसीएस या खासगी संस्थेद्वारे भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला. ही बाब स्पष्ट असताना पुण्यातील पीडीसी बॅंक राज्य सरकारने अधिकृत केलेल्या दोन खासगी संस्थांद्वारे भरती प्रक्रिया राबविण्यास अडचण काय, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
अजित पवार यांनी घालावे लक्ष…
जिल्हा बॅंकेवर मागील अनेक वर्षांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व असून बॅंकेवर त्यांचीच सत्ता आहे. त्यांच्याच बॅंकेकडून भरती प्रक्रियेसंदर्भात गेल्या दोन वर्षांपासून निर्णय होत नाही. त्यामुळे याप्रश्नी उपमुख्यमंत्री पवार यांनी लक्ष घालून लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया सुरु करण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे.
– जिल्हा बॅंकेने लेखनिक पदाच्या 356 जागांसाठी अर्ज मागविले
– 356 जागांसाठी सुमारे 31हजार प्राप्त
– एका अर्जासाठी परिक्षा शुल्क 885 रुपये
– याप्रमाणे बॅंकेकडे 2 कोटी 74 लाख 35 हजार इतकी रक्कम जमा
आर्थिक परिस्थिती, बेरोजगारी यामुळे युवक हैराण आहेत. नोकरी मिळण्यासाठी आम्ही धडपड करत आहोत. बॅंकेत नोकरी मिळेल, या आशेने अर्ज भरला आहे. मात्र, आता यावर कोणतीच प्रक्रिया मागील दोन वर्षांपासून राबविण्यात आलेली नाही. त्यातच आता अनेक उमेदवारांचे वयोमर्यादा संपली असल्याने त्यांना तर या नोकरीपासून वंचीत राहावे लागणार आहे, त्यामुळे जिल्हा बॅंकेने योग्य पद्धतीने व पारदर्शकपणे ही परीक्षा पार पाडावी.
– एक उमेदवार
लेखनिक पदाच्या या भरती प्रक्रियेसंदर्भात संचालक मंडळ आणि सहकार विभागाशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
– डॉ. दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक