मुंबई : पुणे येथील गणेशखिंड उद्यान येथील 33.01 हेक्टर क्षेत्र व जळगाव शहरालगत लांडोरखोरी येथील 48.08 हेक्टर क्षेत्र जैविक वारसा क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.
राष्ट्रीय जैविक विविधता मंडळ चेन्नई यांचेकडून जैविक वारसा स्थळे घोषित करण्याबाबत राज्यांना मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. नागपूर येथील जैविक विविधता मंडळाच्या वतीने राज्यातील जैविक विविधतेबाबत ते कामकाज करीत आहे. यापूर्वी राज्यात ग्लोरी ऑफ आल्लापल्ली, गडचिरोली हे पहिले जैविक वारसा क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.
गणेशखिंड उद्यान पुणे येथे पिकांच्या 49 जाती, फळांच्या 23 जाती उपलब्ध आहेत. या उद्यानात 35 विविध क्षेत्रे असून तेथे विविध वृक्ष व फळझाडे आहेत. यापैकी काही वृक्ष हे 100 वर्षे जुने आहेत. गणेशखिंड पुणे या केंद्राने विविध पिके व फळे यांच्या नवीन 19 जाती विकसित केल्या आहेत. पेशव्यांच्या काळात या भागात आंब्याची बाग विकसित करण्यात आली होती.
ब्रिटिशांच्या कारकिर्दीत गव्हर्नर जनरल सर जॉन माल्कम यांनी हे उद्यान विकसित केले.
गणेशखिंड फळ संशोधन केंद्राच्या पेशवेकालीन आंब्याच्या बागेतील आंब्याची जात हा इतरत्र न आढळणारा जनुकीय ठेवा आहे. याशिवाय, या बागेत 165 प्रकारची जंगलात आढळणारी झाडे आहेत. यातील 48 वनस्पती औषधी आहेत. दुर्मिळ प्रकारातील बुरशी, सूक्ष्म जीवांच्याही नोंदी आहेत.
लांडोरखोरी जळगाव हे स्थळ मेहरून या गावात स्थित असून मेहरून जलाशयाच्या जवळ आहे. हे स्थळ राखीव वनक्षेत्रात असून जळगाव वन विभागाच्या अखत्यारीत आहे. याबाबत जळगाव नगरपालिकेचा संमती ठराव प्राप्त झाला आहे. लांडोरखोरी वनोद्यान हे 48.08 हेक्टर क्षेत्रावर असून मोराचा अधिवास आणि जैवविविधतेने नैसर्गिक अधिवास क्षेत्र आहे. जळगाव वनविभागाने गेल्या पाच वर्षांपासून जाणीवपूर्वक प्रयत्न करून हिरवा पट्टा विकसित केला आहे.
समृद्ध जैवविविधतेने संपन्न अशा खैर, नीम, अंजन, बोर, बाभूळ, काटेसावर, शेवगा, आपटा, हेंकळ यासारख्या 70 हून अधिक वनस्पतींच्या प्रजाती या ठिकाणी आहेत. तर रानडुकर, चिंकारा, निलगाय, ससा, मुंगुस, मोर सारख्या सस्तन प्राण्यांचा वावर, दगड पाल, साधी पाल, उद्यान सरडा, शामेलीयन, धामण, कवड्या, तस्करसारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांच्या 15 पेक्षा जास्त प्रजातीही येथे आहेत. तसेच चंडोल, कापशी, सोनपाठी सुतार, कोतवाल, युरोपियन चाष, शिक्रा इत्यादी स्थानिक व स्थलांतरीत पक्षांच्या 68 प्रजाती येथे आढळून येतात.
जैविक वारसा स्थळे निर्माण केल्याने या क्षेत्रातील प्राणी, पक्षी व वनस्पती संवर्धन योजना तयार करण्यात येऊन प्रजातीचे मूळ स्थळी संवर्धन व वंशवृद्धी करण्यात येते. म्हणून येणाऱ्या काळात राज्यात अशी अनेक ठिकाणे शोधून त्यांना जैविक वारसा स्थळे म्हणून घोषित करणार असल्याची माहितीही वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.