पुणे – भीमा नदीकाठी वसलेले वाकसे टाकळी हे गाव उजनी धरणाच्या उदरात गेले. दोनशे एकरांचा सातबारा असलेले वाकसे कुटुंब धरणग्रस्त बनले. कुटुंबाच्या भाळी स्थलांतराचा शिक्काच बसला. त्यानंतर शासनदरबारी संघर्ष आणि अवहेलना, पुनर्वसित गावांत हेळसांड, गावोगावी भटकंती, हे वयाच्या पाचव्या वर्षांपासून वाकसे कुटुंबातील या मुलाने पाहिले होते. वाकसे कुटुंबातील या मुलाचे नाव आहे गजानन वाकसे.
या मुलाने महाविद्यालयीन जीवनातच चळवळीत संघर्ष सुरू केला. त्यांनी धरणग्रस्त, कष्टकरी, वंचितासाठी 18 व्या वर्षांपासून सुरुवात केल्याने त्यांची सामाजिक, राजकीय कारकीर्द तावूनसुलाखून निघाली. वाकसे यांनी भाजपच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी झटणारा आणि शासनदरबारी पाठपुरावा करणारा नेता, अशी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. भाजप पश्चिम महाराष्ट्र भटक्या विमुक्त आघाडीचे सरचिटणीस गजानन वाकसे यांच्या संघर्षमय वाटचालीचा घेतलेला वृत्तांत…
इंदापूर तालुक्यातील वाकसे टाकळीची बागायती गाव म्हणून ओळख. 1965 च्या दरम्यान, उजनी धरणाच्या निर्मितीच्या हालचाली सुरू झाल्या. धरणात जाणाऱ्या गावांची संख्या लक्षणीय होती. नदीकाठची गावे उठणार होती. शेतीवाडी, घरेदारे पाण्याखाली गडप होणार होती. आपल्याच लोकांसाठी हा एकप्रकारे त्यागच होता. शासनदरबारी यंत्रणा कामाला लागली होती. बागायतदार शेतकरी झटक्यात अल्पभूधारक झाला. वाड्यात श्रीमंती उपभोगणारे शेतकरी धरणग्रस्त पुनर्वसित छावणीत दाखल झाले. 50 वर्षांपूर्वीच्या पिढीने मरणयातना आणि दारिद्य्र जवळून पाहिले होते. हे कुटुंब निराधारच झाले होते.
पंढरपूरजवळील एका गावात या कुटुंबाला पाच एकर शेती दिली. घरातील एका व्यक्तीला नोकरीचे आश्वासन दिले. गुरसाळे (पंढरपूर) गावात शेती दिली. त्या गावातही उभा संघर्ष नशिबी आला. तिथे शेती कसण्यासाठी त्रास होऊ लागला. जो सर्वच धरणग्रस्तांच्या नशिबी येतो. याच कुटुंबातील शंकरराव विठोबा वाकसे यांना कुस्तीची आवड होती. त्यांनी कुस्तीचे डावपेच शिकून आपली मल्लविद्या विकसित केली होती. याच बळावर त्यांची पोलीस दलात भरती झाली.
संघर्ष आणि अवहेलना झाल्याने काही केले तरी आपल्या इंदापूर तालुक्यात राहायचे, असा निश्चय वाकसे कुटुंबाने केला. लासुर्णे येथे शंकरराव वाकसे कुटुंब स्थायिक झाले. शंकरराव वाकसे यांचा मुलगा गजानन वाकसे याने वयाच्या पाचव्या वर्षांपासून धरणग्रस्तांची परवड पाहिली होती. त्यांच्या नशिबी उपेक्षितांचे आयुष्य वाट्याला आले होते. शंकरराव वाकसे यांचा मुलगा गजानन वाकसे यांचे शालेय शिक्षण
लासुर्णे येथे झाले. बारावीपर्यंतचे शिक्षण भवानीनगर येथे झाले. गजानन यांनी वयाच्या अठराव्या वर्षांपासून धरणग्रस्तांसाठी उभे आयुष्य वेचण्याचा निर्णय घेतला. धरणग्रस्तांच्या प्रश्नांला ते भिडू लागले. उपेक्षा या अपेक्षांमध्ये बदलण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करू लागले. त्यांनी चळवळ उभी केली. एक, एक कार्यकर्ता जोडताना त्यांना समाजभान उमगले. त्यामुळे उमदे नेतृत्व बहरले.
धरणग्रस्तांना शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजवू लागले होते. रहिवाशी दाखले, रेशनकार्ड, अन्य कामासाठी अधिकारी, कर्मचारी दाद देत नव्हते. वाकसे यांना ही सल बोचत होती. त्यांनी शासनदरबारी पाठपुरावा सुरू केला. त्यामुळे कामे होऊ लागली. त्यांनी प्रसंगी वकृत्वशैलीचा वापर केला. मात्र, ते माघारी हटले नाहीत. त्यांच्यातील आत्मविश्वासाला बळ मिळत गेले. धरणग्रस्तांच्या चळवळीत एक एक धागा जोडताना त्यांनी समाजातील वंचित घटकांच्या भल्यासाठी परीघ व्यापला होता. त्यांच्यात जबाबदारीचे भान पुरेपूर होते. ते चळवळीतून भारतीय जनता पार्टीत जोडले गेले आहेत.
समाजवसा इंदापूर तालुक्यासाठी आदर्शवत
वाकसे यांनी जन्मभूमी हीच कर्मभूमी मानून लासुर्णे येथून काम सुरू केले. वंचित घटकांसाठी भान होते. वैदू समाजातील 140 कुटुंबांना हक्काचे रेशनकार्ड नव्हते. या कुटुंबासाठी त्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. रेशनकार्ड मिळाल्यानंतर दोन वर्षे धान्यपुरवठा होत नव्हता. हा प्रश्न मार्गी लावला. शेती महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या घरकुल प्रश्नांवर त्यांनी आंदोलन केले. करोनाच्या साथीवेळी जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका चालकांचा विमा उतरविला नव्हता. करोनाग्रस्तांचे सारथ्य करणारा हा घटक विम्यापासून वंचित होता. यासाठी त्यांनी आंदोलन केले. सर्वसामान्यांसाठी वाकसे हे झोकून देऊन काम करीत आहेत. त्यांनी तळागाळातील लोकांच्या प्रश्नांचा निपटारा करून समाजघटकांशी बांधीलकी जोपासली आहे. हा त्यांचा समाजवसा इंदापूर तालुक्यासाठी आदर्शवत आहे.
विधायक कामासाठी कायम प्राधान्य
वाकसे यांनी सुरुवातीपासून वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत विधायक उपक्रम सुरू केला आहे. त्यांनी नीलकंठेश्वर विद्यालयात प्रयोगशाळेला मदत, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, रुग्णांना शस्त्रक्रिया व हॉस्पिटलच्या खर्चासाठी मदत केली आहे. दारिद्य्ररेषेखालील हजारो नागरिकांना जागेअभावी घरकुल बांधण्यास अडचण निर्माण झाली होती. शासन घर बांधणीसाठी जागा घेण्यासही निधी देत आहे; परंतु कमी जागेचे खरेदीखत होत नसल्याने त्यांनी विभागीय आयुक्तांकडे पाठपुरावा केला. घरकुलासाठी एक गुंठ्याचे बक्षीसपत्र करून घरकुल बांधणीस परवानगी मिळवून दिली आहे. लासुर्णे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर बस थांबा सुरू केला.
विकासपर्वची वाटचाल सुखावणारी
वाकसे यांनी वडिलांच्या व्दितीय पुण्यतिथीचा खर्च टाळून अनाथ मुलांच्या शिक्षणाच्या खर्चासाठी नीलकंठेश्वर विद्यालयास 10 हजार रुपयांची मदत केली. भवानीनगर येथील मुक्कामी असलेल्या पालखी सोहळ्यावेळी वारकऱ्यांसाठी 200 फिरती शौचालयांचे युनिट उभारले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या उपक्रमात ते निर्मलवारीचे प्रमुख आहेत. संत तुकाराम महामार्गात बाधित होणाऱ्या ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावे, यासाठी वाकसे यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिनी भाजपातर्फे सेवा सहयोग सप्ताह राबविण्यात आला. अहिल्यादेवी होळकर युवा प्रतिष्ठानचा उपक्रम राबविला आहे. माजी मंत्री गिरीश बापट यांच्या निधीतून 70 लाखांची विकासकामे केली आहेत.
भाजपाचा उद्योन्मुख चेहरा…
गजानन वाकसे हे चळवळीतून आलेले कार्यकर्ते आहेत. त्यातून त्यांची नेतृत्व क्षमता विकसित झाली. त्यानंतर भाजपच्या मुशीत त्यांचे संघटन बांधणीतील कौशल्य विकसित होत गेले. भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्षपद मिळाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाला लोकमान्यता मिळाली. त्यांनतर सध्या ते पश्चिम महाराष्ट्रचे सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. तसेच पुणे आणि सोलापूर जिल्ह्याचे ते प्रभारी आहेत. भटक्या विमुक्तांचे प्रश्न ते तळमळीने सोडवत आहेत. माजी पालकमंत्री गिरीश बापट, आमदार राहुल कुल, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची राजकीय कक्षा विस्तारली आहे. वाकसे यांच्या वाटचालीत कुटुंबाची साथ मिळाली आहे. यात आई शोभा वाकसे, भाऊ महेंद्र वाकसे, राजेंद्र वाकसे, नातेवाईक, हितचिंतकांचे प्रोत्साहन, पाठबळ मिळाले आहे. यातून हे युवा नेतृत्व इंदापूरच्या राजकीय पटलावर आशेचा किरण आहे.
शब्दांकन – रोहित वाघमोडे