पुणे {प्रभात वृत्तसेवा} : दहाव्या लोकसभेत पुण्यात भाजपने पाय रोवले असले, तरी याच कालावधीत पुण्याच्या राजकारणात सुरेश कालमाडींचा उदय झाला. वैमानिकाची नोकरी सोडून राजकारणात आलेल्या कालमाडींनी राजकारणाचे स्वरूप बदलून टाकले.
दिल्लीतील काँग्रेस नेत्यांच्या जवळ असलेल्या कलमाडींनी १९९६ मध्ये झालेल्या अकराव्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांचा तब्बल ८७ हजार मतांनी पराभव करत पुण्याची जागा पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात घेतली.
या निवडणुकीत कलमाडी यांना ३ लाख ९० हजार ७७८ मते मिळाली होती, तर बापट यांनाही सुमारे ३ लाख ३ हजार ७८३ मते मिळाली होती. या निवडणुकीत या दोन मुख्य उमेदवारांसह इतर ४२ उमेदवार रिंगणात होते. रिपाइंकडून नामदेव ढसाळ यांनाही पुण्यात तब्बल ५६ हजार १८५ मते मिळाली होती, तर काँग्रेसचे दोन वेगवेगळ्या गटांचे उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात होते.
१९९० नंतर शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढत गेल्याने शहराची लोकसंख्या, तसेच मतदारसंख्याही वाढत होती. १९९६ च्या लोकसभा निवडणुकीसाठी तब्बल १३ लाख ६४ हजार ९९९ मतदार होते.
त्यातील ७ लाख ७८ हजार १०२ (५७ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मात्र, शहरात आणि नव्याने निर्माण होणाऱ्या उपनगरांमध्ये काँग्रेसच्या माध्यमातून कलमाडी यांनी आपले राजकीय वर्चस्व वाढविल्याने त्यांना या पहिल्याच निवडणुकीत मोठा फायदा झाला. त्याच वेळी काँग्रेसच्या परंपरागत राजकारणाला धक्के देत पुण्यात कलमाडी पॅटर्न सुरू झाला होता.