पिंपरी, (प्रतिनिधी) – देशात हिंदूत्ववादी सरकार आल्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार जाहीर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. केंद्र शासनाने अनेकांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार दिला आहे. त्याच धर्तीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी पतित पावन संघटनेच्यावतीने राजेश मोटे यांनी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे.
स्व.कर्पुरी ठाकूर, स्व.एम.एस.स्वामीनाथन , स्व.पी.व्ही.नरसिंहराव, स्व.चौधरी चरणसिह यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, याबाबत आम्हालाही आनंद असल्याचे पतित पावन संघटनेने म्हटले आहे.
संघटनेने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, मोदी सरकार आल्यापासून स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न जाहीर केला जाईल याची हिंदूत्ववादी कार्यकर्ते आतुरतेने वाट पाहात आहोत. यंदातरी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न जाहीर होईल, अशी अपेक्षा होती.
भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी सुध्दा फक्त राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यापेक्षा केंद्रामधून स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन पतित पावन संघटनेचे महाराष्ट्र प्रांत संपर्क प्रमुख राजेश बबनराव मोटे यांनी केले आहे.