मुंबई – रशिया-युक्रेन युद्धाची गडद छाया संपूर्ण जगावर पसरली असताना आता याचा परिणाम राज्यातील शहरांवर होऊ लागला आहे. या युद्धाने नाशिक, मालेगावसह महाराष्ट्रात महागाईचा बार उडवल्याचे चित्र दिसून येत आहे. एकीकडे निवडणुकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची भीती व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे गोडेतेलाच्या किमतीत सध्याच लिटरमागे 20 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
जग तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल करत आहे का, अशी भीती जागतिक तज्ज्ञ व्यक्त करतायत. त्याचे काय परिणाम होणार, याची चिंता साऱ्यांना लागलीय. आणि आता याची काही प्रमाणात सुरुवात देखील झाल्याचे दिसून येत आहे. या दोन देशांच्या युद्धाचे परिणाम आता थेट सर्वसामान्यांच्या जीवनावर होऊ लागले असून, येणाऱ्या काळात याचा मोठा फटका बसणार हे नक्कीच.
कारण, भारतात जवळपास 70 टक्के सूर्यफूल तेल युक्रेनमधून आयात केले जाते. पण अपुऱ्या पुरवठ्याने मालेगाव शहरात खाद्य तेलाचे भाव चार दिवसांमध्ये तब्बल वीस रुपयांनी महागले आहेत. तर शेंगदाणे, करडई, सूर्यफूल आणि सोयाबीन या सारख्या तेलांच्या भावामध्ये सुद्धा चांगलीच भर पडली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार येणाऱ्या काही काळात तेलाचे भाव आणखी वाढीला अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.